Monday, November 23, 2015

स्वागत दिवाळी अंकांचे 13


विविध दिवाळी अंकांमधील साहित्याचा परिचय-
लोकसत्ता
सर्वसमावेशक विषयांमुळे ‘लोकसत्ता’चा दिवाळी अंक परिपूर्ण ठरला आहे. अंकाची सुरुवात गुलजारांच्या अक्षरचित्रांनी होते. गुलजारांच्या कथांचा अनुवाद अंबरिश मिश्र यांनी केला असून या कथांमधून माणसाच्या जगण्याचे विविध कंगोरे दिसतात. ‘आयटी - एक जीवनशैली’ या विभागामध्ये आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची मन:स्थिती, त्यांचे कौटुंबिक, सामाजिक जीवन, त्यांची बदलत जाणारी जीवनशैली या सगळ्याचा आढावा घेतला आहे. आपल्याकडे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा प्रकार रुजायला लागला आहे. याबद्दलची चर्चा ‘लग्नाविना सहजीवन’ या विभागात करण्यात आली आहे. या संदर्भात करिना कपूर, अनुपमा नारनवरे, भरत दाभोळकर यांचे लेख वाचनीय आहेत. प्रशांत कुलकर्णी यांच्या ‘दुर्मीळ बाळासाहेब’ या लेखामध्ये बाळासाहेबांची मार्मिक आणि दुर्मीळ व्यंगचित्रे आहेत. अरब देशांमध्ये झालेल्या क्रांती, त्यांच्यामागचे राजकारण आणि त्याचे होणारे परिणाम या सर्वाचा वेध गिरीश कुबेर यांनी त्यांच्या ‘अनौरस क्रांती’ या लेखामध्ये घेतला आहे. फसलेल्या क्रांत्या या विभागात ‘ऑक्युपाय’ - एक क्लोजप’! आणि ‘जनआंदोलन नव्हे; नेत्यांचे अपयश’ हे लेख आहेत. भारतीय चित्रपटांमधील बदलांचा वेध घेणारा ‘बदलता सिनेमा’ हा विभाग अंकामध्ये आहे. यामध्ये अनुराग कश्यप, सत्यजित भटकळ यांचे लेख आहेत. ‘एक अस्वस्थ वादळ : गो. रा. खैरनार’ या लेखात खैरनार यांच्या जीवनाचा उत्तरार्ध चित्रित केला आहे.
व्यवस्थापकीय संपादक : गिरीश कुबेर, पृष्ठ संख्या : १९२, किंमत : १०० रुपये
दीपावली
दीपावलीच्या अंकाची सुरुवात होते ती सुहास बहुळकर यांच्या ‘कलावंत आणि मॉडेल’ या लेखाने. चित्रांमधील नग्नता, अश्लीलता यावर भाष्य करणारा हा लेख आहे. ‘माझा मित्र ग्रेस आणि कवी ग्रेस’ हा रामदास भटकळ यांचा लेख ग्रेस यांची दोन उत्कट रूपं दाखवतो. मानसोपचारतज्ज्ञ आनंद नाडकर्णी यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी बाजू ‘माझा आनंदा’ या अनिल अवचट यांच्या लेखामधून दिसते. द्वारकानाथ संझगिरी यांनी आपल्या ‘लढवय्यांच्या देशात चार दिवस’ या लेखातून इस्र्रायलची सैर घडवली आहे. इस्र्रायलचा इतिहास, तेथील समाजजीवन, लोकांची आपल्या देशाबद्दलची त्यागाची भावना या गोष्टी त्यांच्या लेखातून जाणवतात. तसेच इस्र्रायलने विविध क्षेत्रात केलेला भीम पराक्रमदेखील या लेखाच्या निमित्ताने दिसतो. या अंकातील कथा अंकाची वाचनीयता वाढवतात. अंकाच्या मुखपृष्ठावरील चित्र आकर्षक आहे.
संपादक - अशोक कोठावळे, पृष्ठ संख्या - २२७, किंमत - १०० रुपये.
ऋतुरंग
यंदाच्या ऋतुरंगच्या दिवाळी अंकामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या गतस्मृतींना उजाळा दिला आहे. अंकाची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नैयर यांच्या लेखाने होते. आपल्या पाकिस्तानमधल्या ‘पीरसाहेबां’च्या आठवणीमध्ये हरवलेले नैयर आपल्याला जुन्या पाकिस्तानची सैर करून आणतात. बालपणीच्या आठवणींमध्ये रमलेले नाना पाटेकर वास्तव स्वीकारायला तयारच नाहीत. शिवचरित्र कथनाची पंन्नास वर्षे कशी सरली, लोकांनीच शिवशाहीर कसे केले आणि आजही शिवचरित्र जगण्याची प्रेरणा कसे देते या आपल्या आठवणींचे पदर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या लेखात उलगडले आहेत. बातमीच्या पलीकडे या लेखात जेष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांनी आपले दिल्लीतील अनुभव सांगितले आहेत. मी आणि माझे मद्यपान या लेखात ‘लोकसत्ता’चे व्यवस्थापकीय संपादक गिरीश कुबेर यांनी मद्यपानाच्या निमित्ताने अनेक जुन्या किश्श्यांच्या, मैफिलींच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
संपादक : अरुण शेवते, पृष्ठ संख्या : १८८, किंमत : १०० रुपये,
धनंजय
धनंजय या दिवाळी अंकामध्ये विविध कथांचे प्रकार आहेत. कथांची सुरुवात प्रेम वैद्य यांच्या बंगालचा मुक्तिसंग्राम या कथेने होते. फिल्म डिव्हिजनसाठी केलेल्या चित्रीकरणाच्या निमित्ताने त्यांनी प्रत्यक्ष युद्धभूमीवर जाऊन जे अनुभव घेतले ते या लेखामधून दिसतात. ‘सूर लावते ती मीच की मी नाही? गूढ काही’ हा आरती अंकलीकर-टिकेकर यांचा लेख वाचनीय आहे. ‘फ्रोलाईन उनबेकान्र’ या बाळ फोंडके यांच्या लेखामध्ये त्यांनी ८० वर्ष जुन्या सांगाडय़ांच्या डी.एन.ए मिळवून त्यातून रोमोनॉव्ह राजघराण्याच्या वंशजांच्या शोधाच्या कामाची चित्तथराराक कथा आहे. ‘जसवंतगढचे गूढ’ हा लेख जसवंतसिंग या भारतीय वीराच्या पराक्रमाची आठवण करून देणारा आहे.
संपादक : नीलिमा कुलकर्णी, पृष्ठ संख्या : ३७६, किंमत : १२० रुपये.
एकता
एकता मासिकाच्या दिवाळी अंकात स्वामी विवेकानंद यांच्यावरील लेख वाचायला मिळतात. विवेकानंदांच्या शतकोत्तर सुवर्णजयंती निमित्त डॉ. वि. रा. करंदीकर यांनी विवेकानंदांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा आढावा घेणारा लेख लिहिला आहे. भगवान गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनात सेवा हा समान धागा आहे. समाजाची सेवा करण्याचा संदेश दोघांच्याही जीवनात दिसतो. या दोघांच्याही शिकवणीतील साम्य ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांनी आपल्या ‘तथागत आणि स्वामी विवेकानंद’ या लेखामध्ये सांगितले आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा जीवनप्रवास उलगडणारा ‘देवराष्ट्र ते दिल्ली’ हा डॉ. न.म.जोशी यांचा लेख या अंकात आहे. तसेच यशवंतराव चव्हाणांच्या पत्नी वेणुताई यांचे यशवंतरावांच्या कारकीर्दीतील योगदान दाखवणारा वसुधा परांजपे यांचा ‘हिमालयाची सावली’ हा लेख आहे.
संपादक : विद्याधर ताठे, पृष्ठ संख्या : १९८, किंमत : १५० रुपये.
चंद्रकांत
चंद्रकांत या दिवाळी अंकामध्ये सहा कादंबऱ्यांमधील काही भाग कथारूपाने देण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर फिल्म डिव्हिजनने वीर सावरकर हा चित्रपट बनवला. या चित्रपटाच्या निर्मितीची कहाणी आणि फिल्म डिव्हिजनच्या सुरुवातीच्या काळामधील कार्याचा परिचय करून देणारा प्रेम वैद्य यांचा लेख वाचनीय आहे. ‘रारंग ढांग’ या प्रभाकर पेंढारकर यांच्या कादंबरीवर लिहिलेली श्रीकृष्ण सवदी यांची दीर्घकथा एका अभियंत्याचा वेगळा प्रवास दाखवते. ‘फिरूनी पुन्हा जन्मेन मी’ ही दीर्घकथा म्हणजे जॉन गॉदेय यांच्या ‘द स्नेक’ या कादंबरीचा अनुवाद असून यामध्ये मानवी जीवनाचे एक वेगळेच अंग पाहायला मिळते. दर्जेदार दीर्घकथा हे या दिवाळी अंकाचे वैशिष्टय़ आहे.
संपादक : नीलिमा कुलकर्णी, पृष्ठ संख्या : ३२०, किंमत : १२० रुपये.
आपला परम मित्र
परम मित्रच्या दिवाळी अंकात साहित्य, संस्कृती, इतिहास, चित्रपट आणि काही सामाजिक विषयांचा समावेश आहे. अंकाची सुरुवात होते ती साधना बहुळकर यांच्या ‘त्या दोघांच्या स्त्री-प्रतिमा’ या लेखापासून. गुस्ताव क्लिम्ट आणि रवी वर्मा हे दोघे समकालीन चित्रकार होते. दोघांनी रेखाटलेल्या स्त्री-प्रतिमांचा या लेखात मागोवा घेण्यात आला आहे. आपल्या ‘इतिहासाचे उपेक्षित वारसदार’ या लेखामध्ये पेशवे, इब्राहिम गारदी आणि अन्य काही कर्तृत्ववान लोकांच्या हयात असणाऱ्या वंशजांचा परिचय आणि त्यांच्या समाजाकडून असणाऱ्या अपेक्षा मांडण्यात आल्या आहेत. ‘अस्वस्थ शतकाचा दिग्दर्शक मृणालदा’ या लेखामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक मृणाल सेन यांची कारकीर्द, त्यांच्या चित्रपटांचं वेगळेपण याची चर्चा केली गेली आहे. रशियाने इजिप्तला दिलेलं लढाऊ मिग विमान इस्रायलने पळवून आणलं ही चित्तथरारक कथा ‘ऑपरेशन पेनीसिलीन इराकी मिग-२१ चं साहसी हरण’ या पंकज कालुवाला यांनी लिहिली आहे.
संपादक - माधव जोशी, पृष्ठसंख्या - १७६, किंमत - १०० रुपये.
मैत्रीण
मैत्रीणचा दिवाळी अंक हा वैविध्याने बहरलेला आहे. या अंकात मनामनातलं नातं, वेगळं क्षितिज, कथा, कविता असे विभाग आहेत. सावनी शेंडे आणि बेला शेंडे या गायक भगिनींच्या नात्यातली ‘स्पेस’ सांगणारा, आरती कुहीकर यांनी शब्दांकित केलेला लेख. प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्या मधलं विश्वासाचं नातं उलगडणारा वैजयंती कुलकर्णी यांचा लेख हे या विभागाचे वैशिष्टय़ आहे. वेगळं क्षितिज या विभागात रोबोट बनवणारं सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या अरुंधती जोशी, अर्थतज्ज्ञ आणि अ‍ॅक्च्युरी असणाऱ्या दीपा पंडित आणि बार कौन्सिलच्या पहिल्या महिला सचिव डॉ. वर्षां रोकडे यांचा थक्क करणारा यशस्वी प्रवास येथे पाहायला मिळतो. या व्यतिरिक्त गुरू ठाकूर, किशोर कदम आणि प्रज्ञा पवार यांच्या कवितादेखील या अंकाची वाचनीयता वाढवतात.
संपादक : वर्षां सत्पाळकर, पृष्ठ संख्या : १६०, किंमत : १०० रुपये.
भटकंती
मुशाफिऱ्यांसाठी पर्वणी ठरावा असा भटकंती दिवाळी अंक आहे. अतिथी संपादक मिलिंद गुणाजी यांनी केरळमधील पल्लकडच्या सौंदर्याचे दर्शन घडवले आहे. कच्छच्या रणाची अनोखी सफर ‘गुजरात मधील व्हाइट डेझर्ट’ या लेखात अरविंद आपटे यांनी घडवली आहे. टायटॅनिकच्या जलसमाधीला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. टायटॅनिकची बांधणी ज्या बेलफास्ट येथे झाली त्या कलानगरीचं दर्शन श्वेता चिटणीस यांच्या ‘टायटॅनिकचं जन्मस्थान’ या लेखात घडतं. गूढरम्य कसिनो या लेखामध्ये जगातील प्रसिद्ध कसिनोची सैरच होते. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या ग्रीन हीरोंची ओळख करून देणारा ‘ग्रीन हिरोज’ हा विभाग समाजातील संवेदनशीलतेचे दर्शन घडवतो. सुंदर छायाचित्रे हे या अंकाचे वैशिष्टय़ आहे.
संपादक : वर्षां सत्पाळकर, पृष्ठ संख्या : १६०, किंमत : १०० रुपये
अ‍ॅग्रोटेक
शेती करताना ज्यांनी साहित्याचे मळे फुलवले अशा साहित्यिक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेती कशी दिसते हे सांगणारा लेख रविप्रकाश कुलकर्णी यांनी लिहिला आहे. यामध्ये त्यांनी ना.धों.महानोर, व्यंकटेश माडगूळकर आणि सदानंद देशमुख यांचे चित्रण केले आहे. ‘सेलिब्रेटिजची शेती’ या विभागात विक्रम गोखले, अशोक हांडे, सयाजी शिंदे, सचिन पाठक, देविदास चौधरी यांची शेती आणि त्यांचा शेती करण्याचा अनुभव यामध्ये देण्यात आला आहे. खा. हरिभाऊ जावळे यांच्या ‘ऑस्ट्रेलियातील आधुनिक शेती’ या लेखामध्ये शेतीमध्ये आलेले नवीन तंत्रज्ञान, नवी पिकं, त्यांची बाजारपेठ आणि ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहायला मिळतो. गेल्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातील कथेवर आधारित आणि कृषी क्षेत्राशी संबंधित काही मराठी चित्रपट आले या सर्व चित्रपटांचा आढावा ‘कृषिप्रधान मराठी चित्रपट’ या दिलीप ठाकूर यांच्या लेखामध्ये घेण्यात आला आहे.
संपादक : गणेश हाके, पृष्ठ संख्या : १३०, किंमत : ५० रुपये.
ललित
नरेंद्र चपळगावकर यांच्या ‘बी रघुनाथ’ या लेखामध्ये, बी. रघुनाथ या मराठवाडय़ातील फारशी प्रसिद्धी न मिळालेल्या पण दर्जेदार साहित्याची निर्मिती करणाऱ्या साहित्यिकाचा परिचय करून देण्यात आला आहे. दीपक घारे यांच्या ‘जोग सर’ या लेखात जोग सरांचे घारे यांच्या आयुष्यातील स्थान आणि अशोक जोग यांचं व्यक्तिमत्त्व पाहायला मिळतं. आसामी लोकांच्या जगण्याचे आणि आसामी संस्कृतीचे दर्शन मित्रा फुकन यांच्या लेखनातून वारंवार होते. मीना वैशंपायन यांनी ‘अनोखा आसामी राग-मित्रा फुकन’ या लेखामध्ये मित्रा फुकन यांच्या साहित्याचा आढावा घेतला आहे. बंगालमधील धाडसी लेखिका मैत्रेयीदेवी यांच्या साहित्याचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय ‘वंग लेखिकेचे अदम्य धाडस’ या नंदिनी आत्मसिद्ध यांच्या लेखात करून देण्यात आला आहे.
संपादक : अशोक कोठावळे, पृष्ठ संख्या : १९२, किंमत : ८० रुपये.
सामना
देशातील महागाईच्या प्रश्नाचा वेगवेगळ्या लेखांच्या माध्यमातून घेतलेला वेध हे सामनाच्या दिवाळी अंकाचे वेगळेपण आहे. ‘महागाईची दिवाळी’, द. मा. मिरासदार यांचा ‘ती दिवाळी हरवली’ , ‘कवीचा एल्गार’ हा अरुण म्हात्रे यांचा लेख आणि ‘ती महागाई’ हे लेख वाचनीय आहेत. कथा विभागामध्ये गिरिजा कीर यांची ‘एकदा एका प्रवासात’ ही कथा चांगली आहे. ‘बर्फ नव्हे ते रक्त आमुचे’ ही विनायक अभ्यंकर यांची कथा १९६२ च्या युद्धातील पराभवाची मिमांसा करणारी आहे. आपल्या तत्कालीन सरकारच्या चुकीच्या धोरणांवर या कथेमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. ‘त्याग’ ही अंजली बोंगाळे यांची कथा नात्यातील जिव्हाळा दाखवणारी आहे. बॉम्बस्फोट आणि देवाघरचा न्याय या कथादेखील वाचनीय आहेत. ‘दलालांची टीकाचित्रे’ हे सामनाच्या अंकाचे वैषिष्टय़ मानावे लागेल.
संपादक : बाळ ठाकरे, पृष्ठसंख्या : १५२
लाजरी
कर्तृत्ववान महिलांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देणारा अंक असे लाजरीच्या दिवाळी अंकाचे वर्णन करावे लागेल. यामध्ये म्यानमारच्या स्वातंत्र्याचा हुंकार बनलेल्या आँग सान सू की, परिस्थितीशी दोन हात करून ऑलिम्पिकची मजल मारणारी मेरी कोम आणि लायबेरिन देशातील गृहयुद्धामध्ये महिलांचा आधार बनलेल्या लेमॅह ब्वॉवी यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. या शिवाय ‘शब्बो ते हमिदाबाई व्हाया नीना कुलकर्णी’ या लेखात नीना कुलकर्णी यांचा अभिनय प्रवास उलगडला आहे. तर अनघा दिघे यांनी आपल्या लेखातून थिएटर गुरू इब्राहिम आल्काझी यांना शब्दांच्या माध्यमातून रेखाटले आहे. या शिवाय विविध ठिकाणची खाद्यसंस्कृतीदेखील अंकात दिली आहे.
संपादक : अजित पडवळ, पृष्ठ संख्या : १४८, किंमत : १०० रुपये.
श्री सद्गुरु साईकृपा
या अंकामध्ये गंगेचे आध्यात्मिक महत्त्व सांगणारा ‘देवी गंगा’ हा डॉ. सुषमा सातपुते यांचा लेख आहे. तर जगन्नाथ पंडितांची गंगेप्रति असणारी भक्ती ‘जगन्नाथ पंडितांची गंगाभक्ती’ या लेखात दिसते. डॉ. माधव दीक्षित यांच्या ‘गंगेच्या तीर्थजलातील रासायनिक तत्त्वे आणि पर्यावरण’ या लेखात गंगेचे वैज्ञानिक महत्त्व मांडले आहे.
संपादक : बाळ जाधव, पृष्ठ संख्या : १४४, किंमत : ६० रुपये.
श्री दीपलक्ष्मी
श्री दीपलक्ष्मी अंकामधील राजेश खन्नाचा जीवन प्रवास सांगणारा ‘राजेश खन्ना’ हा संजीव पाध्ये यांचा लेख आणि ‘जेम्स बॉण्ड नॉक आऊट ५०’ हा डॉ. श्रीकांत मुंदरगी यांचा लेख हे या दिवाळी अंकाचे बलस्थान आहे. ‘मास्टर भगवान मर्दानी नायक, अभिजात नर्तक’ या लेखामध्ये अरुण पुराणिक यांनी मास्टर भवान या अभिजात अभिनेत्याच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. अभिनय आणि नृत्यकला यांच्या जोरावर चित्रपट क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या मास्टर भगवान यांच्या व्यक्तीगत जीवनाचे चित्रणदेखील या लेखामध्ये आहे. यशस्वी प्रकाशक हर्षां भटकळ यांची सुभाष अवचट यांनी मुलाखत घेतली आहे. अंकातील विनोद मार्मिक आहेत.
संपादक : हेमंत रायकर, पृष्ठ संख्या : २४८, किंमत : १२० रुपये.
जिद्द
अंकाची सुरुवात ‘शूर्पणखेचे रहस्य’ या एस. काळसेकर यांच्या लेखापासून होते. यामध्ये शूर्पणखेचे सहसा न वाचायला मिळणारे वर्णन आहे. श्रीलंकेतून तिचे इतक्या लांब येणे, रावणाचे नाविक दल, त्या वेळची भौगोलिक स्थिती या गोष्टींची माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण दिग्विजयी मोहीम, त्या मोहिमेचे ऐतिहासिक महत्त्व, त्यामागचे राजकीय डावपेच आणि दक्षिणेतील तत्कालीन सामाजिक परिस्थिती याची माहिती देणारा अरुण भंडारे यांचा लेख अंकामध्ये आहे.
संपादक : सुनील राज, पृष्ठ संख्या : ९२, किंमत : ५० रुपये.

तुलसी विवाह

दिवाळीनंतर एकादशीला तुलसी विवाह व त्यानंतर गोवर्धन पूजा देशभरात केली जाते. गोप संस्कृतीची महत्त्वपूर्ण अनुष्ठाने यात जोडली गेली आहेत. एक पर्व सण आणि सणापासून उत्सवाची एक पूर्ण संस्कृती दिवाळीसोबत तयार होत गेली आहे.
देवत्रयीमध्ये श्रीविष्णू सृष्टीचे पालनकर्ता तसेच काळाच्या विभिन्न रूपात नारायणाच्या शक्तीचे अवतार आहेत. अवतार शिव किंवा ब्रह्मदेवाचे नसून विष्णूचेही अवतार आहेत. संगोपन करणाऱ्या कृपादायी त्राणापेक्षा मुक्ती देणारे दशावतारी असतात. त्यांची आद्यशक्ती श्रीलक्ष्मीला धन-धान्य, वैभव, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवी म्हटले आहे. ते भूमी, अन्न, रत्न, अलंकार, धन आणि सुखाचे बोध किंवा अनुभूतीचे अधिष्ठाता आहेत. दिवाळीला अनुष्ठानपूर्वक त्यांचा पूजा-अर्चा विधी करण्यात येतो. भारतात दिवाळी ही श्रीलक्ष्मीपूजनाचे पर्व नसून ती एक संस्कृती रचना आहे. "वैभव लक्ष्मी'च्या आगमनाआधी घर, निवास आणि कार्यस्थळांची साफसफाई, योग्य व सुंदर सजावट होते. वैभव प्रत्येक स्थानास आणि प्रत्येक
स्थितीत असू शकत नाही. तिच्या आगमनाने "स्वस्ती आणि स्वागताच्या' आधी स्वच्छ पवित्र वेश करावा लागतो.

घरांमध्ये स्त्रियांना लक्ष्मीरूप मानले जाते. त्या सुंदर, सुरुचीपूर्ण वस्त्रालंकाराने सजून लक्ष्मीदेवतेचे स्वागत आणि पूजा करतात. स्त्रिया परिवारातील सजीव लक्ष्मी अाहेत. त्यांच्यामुळे परिवाराचे अस्तित्व असते. त्या कुळाची शोभा वाढवतात. त्याच घराची शोभाही आहेत.

दिवाळीच्या एक दिवस आधी श्रीधन्वंतरीची पूजा केली जाते. ते भारतातील आरोग्याचे, अायुर्वेदाचे अधिष्ठाता आणि आद्य संशोधक आहेत. "निरोगी काया'लाच सर्वात मोठे धन आणि वरदान म्हटले गेले आहे. धनत्रयोदशीला एखाद्या धातूच्या भांड्याची खरेदी करून शुभारंभ केला जातो. इतक्या आधारावर दिवाळीत लक्ष्मीचे पूजन केले जाते. दिवाळी सण किती व्यवहार्य आणि अनुष्ठानाची समग्रता आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. तो केवळ सण नसून एक संस्कृती आहे. याला भारतीय जीवनात सुंदरपणे रचले गेले आहे.

समुद्रमंथनासारखा विराट प्रकल्प करणे केवळ देवादिकांना शक्य नव्हते, दैत्यांचीही त्यासाठी मदत घ्यावी लागली. विषाक्त मदिराचल पर्वत मंथनासाठी आणि वासुकी नागाचा दोरखंड तयार करून समुद्रातून जे निघाले त्यात लक्ष्मीदेवता आहे. धनसंपदा केवळ इच्छा व्यक्त करून किंवा स्वप्ने पाहून येत नसते. जीवनात सागर मंथनसारखा विशाल उपक्रम आणि उद्योग करावा लागतो. तेव्हा लक्ष्मी प्रकट होते. "भूमी आणि समुद्र' संपदेचे अक्षय स्रोत आहेत. जीवनाच्या रचनेत त्याचा उपयोग करावा लागेल. तेव्हा कुठे ती मूल्यवान संपत्तीत बदलेल. कठाेर परिश्रम केल्याशिवाय, बेइमानी, भ्रष्ट मार्ग आणि अनीतीने केलेली धनसंपदा भ्रष्ट मार्गानेच कलंक सागरात बुडते.

लक्ष्मीच्या अनंत शक्तीमध्ये "श्री शक्ती' "माया'शक्ती सामावलेली आहे."माया' अद््भुत शब्द आहे. याच्या अर्थाचा विस्तार केला तर तो चकित करणारा आहे. जगात एखाद्या भाषेत असा शब्द असेल जो "अर्था'च्या इतक्या "विशाल समष्टी'साठी व्यवहारात करण्यात येतो. आर्ष परंपरापासून ते लौकिक ज्ञानापर्यंत याला एका निश्चित अर्थात बंदिस्त करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. हा एक शब्दच एक गूढ काव्यार्थ आहे. याच्या मर्माला चेतना ओळखते, परंतु भाषा सांगू शकत नाही. अशी शक्ती धारण करणाऱ्या लक्ष्मीचे पती श्रीनारायण विष्णूचे एक विशेषण "मायापती' असेही आहे. ते मायाशक्तीचे अधिपती आहेत. तेच मायापतीसुद्धा आहेत.

यासाठी दिवाळीला त्यांची पूजा करणे त्यांच्या "मायाशक्ती'साठीच करू नये. "समग्र लक्ष्मी'रूपाची प्रार्थना करा. व्यापार आणि श्रमाने अर्जित धन असावे. धनाच्या प्रदर्शनाचे अवडंबर आणि धनी असण्याचा गर्व नसावा. संपन्नतेचे ऐश्वर्य असावे. वैभवाची "अश्लीलता' नसावी. संपन्न होण्याची अनुभूती अहंकारात बदलून कोणा "वंचिता'चा अपमान करू नका. कामना करा की, श्रीलक्ष्मी समृद्धी दे पण ती टिकून राहण्यासाठी "शालीनता' जरूर दे. धनी करून आमचे मन छोटे आणि संकुचित होऊ देऊ नकोस. त्यामुळे करुणेचे स्रोत आटून जातील.
वस्तुस्थिती- समुद्रमंथनातून हलाहल विष, कामधेनू, अश्व, एेरावत, कौस्तुभ मणी, रंभा, श्रीलक्ष्मी, वारुणी, चंद्रमा, पांचजन्य, धन्वंतरी, अमृतकलश प्रकट झाले होते.

स्वागत दिवाळी अंकांचे 12

निळू दामलेंचा 'पंतप्रधान विकणे आहे' हा लेख नेत्याचे मार्केटिंग या अभिनव कल्पनेचा वेध घेणारा आहे. परंतु हा बव्हंशी तपशीलाच्या, माहितीच्या पातळीवरच राहतो. विश्लेषण, विवेचन फारसे खोल जाताना दिसत नाही.
सेल्फी' या सदरामधे तरुण मंडळींच्या स्वतःच्या आयुष्याचा वेध घेणारे लेख आहेत. यात आपल्या समवयस्कांपेक्षा वेगळे असल्याची रास्त जाणीव असलेल्या नि त्याचे बरेवाईट परिणाम सहन कराव्या लागणार्‍या श्रुती आवटेने शब्दबद्ध केलेले 'सटकलेली माझी पिढी' हे सेल्फी लेखन आवर्जून वाचण्याजोगे. गृहितकानुसार दंभ-श्रेष्ठत्वाचे जगणे मिळालेल्या ब्राह्मण समाजात असल्याचे काही नकारात्मक परिणाम अनुभवणार्‍या कौस्तुभचे 'आहे मी ब्राह्मण मग?' हे देखील विचाराला चालना देणारे ठरावे.
कथांच्या जंत्रीमधे बोकीलांची 'चित्ता' संपूर्ण निराश करणारी. पालावरचं जिणं जगायला लागू नये म्हणून बापाने वसतिगृहात आणून सोडलेल्या कुण्या छोट्याची 'घरा'ची ओढ नि त्यासाठी त्याने वसतीगृहातून पळ काढत अंधाराच्या नि डोक्यावरून जाणार्‍या विजेच्या तारांच्या सोबतीने केलेला प्रवास हा कथेचा गाभा नि पुरा विषयही. अशा वेळी घटनांपेक्षा त्या मुलाच्या मानसिक आंदोलनांना, विचारांना, अनुभवांना कथेचा मुख्य आधार बनवावे लागते. दुर्दैवाने मला तरी त्या मुलाचे पात्र उभे राहिले तरी व्यक्तिमत्व उभे राहिले असे वाटले नाही. त्या ऐवजी परिसरघटकांचे येणारे तपशील कंटाळवाणे होत जातात. त्या परिसरघटकांच्या कथनातून्/मांडणीतून निसर्गालाही त्या पात्राच्या भावनेच्या आवर्तात आणणे शक्य असते. ते ही फारसे साधले आहे असे म्हणू शकत नाही.
उत्पल व. बा. यांची मला स्वतःला बेहद्द आवडलेली 'फ्रेंड्स' ही कविता 'f कविता' (फेसबुकवरच्या कविता) या सदरात पाहून फारच आनंद झाला. त्याबाबत मी थोडे विवेचन माझ्या 'अनाहत'च्या ऑक्टोबरच्या अंकात केलेले आहेच. अक्षरच्या संपादकांना या निवडीबद्दल धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. संध्या सोमण यांची कविताही आधीच फेसबुकवर वाचलेली नि आवडलेली.
अकोलकरांचा रफिक, रशीद आणि दरायुस (हा पर्शियाचा राजा, याचा उच्चार दरायस असा आहे असा माझा समज आहे.) या चित्रपटप्रेमींवरचा लेख स्वतंत्रपणे एकेकाच्या चित्रपटवेडाला अनुभवण्यासाठी अवश्य वाचावा. फक्त तिघांचा एकत्र लेख लिहिताना सांधा नीट न जुळल्याने वाचताना काहीसा गोंधळ उडतो. सतीशबाबाची ना.मा. निराळे नेहेमीप्रमाणेच सफाईदार पण आश्चर्यकारकरित्या सरळ विणीची. बाबाचे नेहेमीचे वळसे/पेच फारसे नाहीत.
या सार्‍या पसार्‍यात आवर्जून उल्लेख करावेत नि वाचावे'च' असा सल्ला द्यावा असे दोन लेख. पहिला गजू तायडेंचा ग्राफिक्स नॉवेलवरचा लेख. निव्वळ कॉमिक्स या स्वरूपात आपण पहात आलेला इलस्ट्रेशनचा नि त्यापुढे थेट चित्रांचा वापर निव्वळ मुलांची करमणूक वा इलस्ट्रेशन पुरता न ठेवता परिपूर्ण अशा चित्रभाषेत करून त्या आधारे साहित्यिक आविष्कार करणे या तुलनेने कमी प्रसिद्ध अशा परंपरेची ओळख करून घेणे मस्ट.
आणि दुसरी कन्नड लेखक वसुधेंद्र यांची द्वा.व. अरवंदेकरांनी अनुवाद केलेली 'जिथे क्षमा केली जात नाही' ही कथा. या कथेने मला अंतर्बाह्य हलवून सोडले. आमचे दिवंगत मित्र श्रावण मोडक यांच्याबरोबर झालेल्या 'सुप्त हिंसा' याविषयावरील चर्चेची तिने आठवण करून दिली. हिंसा ही नेहेमीच रक्त काढणार्‍या शस्त्रांनी केली जाते असे नव्हे. विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी, प्रगती साधण्यासाठी निर्माण केलेली संवादी साधनेही कशी हिसेंचे अक्राळविक्राळ हत्यार बनून जातात याची हादरवून टाकणारी अनुभूती तिने दिली. ईमेल, फेसबुक, ट्विटर यासारखी संपर्कमाध्यमे वापरणार्‍यांना आपल्या मनात डोकावून पहायला भाग पाडणारी कथा, माझ्या मते या अंकाचा चरमबिंदू! (हिच्यावर स्वतंत्रपणे लिहायला हवे.) कथांच्या यादीतच गणेश मतकरींची 'शूट' ही कथा चित्रपटांच्या परिभाषेला, त्यातील परिमाणांना कथेमधे बेमालूमपणे सामावून घेणारी.
शिफारसः
१. 'जिथे क्षमा केली जात नाही' - मूळ लेखक वसुधेंद्र, अनुवादक: द्वा.व. अरवंदेकर
२. 'फ्रेंड्स' (कविता) - उत्पल व. बा.
३. चित्र-शब्दांचं गारुड - गजू तायडे

स्वागत दिवाळी अंकांचे 9

दर्यावर्दी
दिवाळी अंक ही मराठीतील साहित्यिक मेजवानी आहे. बदलत्या युगात संगणकीय व इंटरनेटच्या माध्यमातून आजची तरुण पिढी दिवाळी अंकाच्या वाचनाकडे वळत आहे. ‘कोकणी दर्यावदी’ या लेखात कोकणातील दर्यावदींची माहिती दिली आहे. कोकणातील दर्यावदी हे चैतन्यशील व काटक असतात. ७० ते ८० वर्षापूर्वी शिक्षणात मागे असलेला दर्यावदी समाज आता शिकू लागला आहे. हे कुशल व धाडसी असून रात्रंदिवस मत्स्य व्यवसायाचा कर्मयोग जपणे हाच त्यांचा स्थायीभाव असेल. या दर्यावदींच्या महिलाही शिक्षण नसतानाही व्यवहार ज्ञानाच्या कौशल्यावर मत्स्य व्यवसायाचे अर्थशास्त्र पेलताना दिसतात. ‘बर्फाळलेल्या समुद्रातील तुरुंग’ हा लेखही अंगावर काटा आणणारा आहे. ‘मदतीसाठी हाक’ हा विलास फडके, ‘गौरी’ अरुणकुमार यादव, ‘जीवनाधार’ अ. के. देशपांडे, ‘अभागी’ सुधीर पाटील यांचे लेखही वाचनीय बनले आहेत. ‘कोकणातील – कॅलिफोर्निया’ श्रीवर्धन या लेखामध्ये या गावाचे वर्णन केले आहे. श्रीवर्धन गावात बाळाजी विश्वनाथांच्या मूळ वास्तूच्या चौथ-यावर पेशव्यांचे स्मारक उभे आहे. तसेच श्रीवर्धनपासून १६ किलोमीटरवर दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे हरिहरेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे. या गावालाही विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. नारळ, सुपारी, केळीच्या बागांनी श्रीवर्धनचे वैभव राखले आहे. ‘अनाथांचा नाथ-गोपीनाथ’ हा पांडुरंग भाबल यांचा मुंडेंवरील लेख वाचनीय व माहितीप्रदान आहे. मुंडे यांच्यात समयसूचकता आणि निर्णयक्षमता प्रचंड होती. ग्रामीण व शहरी जीवनाचा समन्वय साधत आपल्या भूमिका ते नेत्यांचा गळी उतरवण्यात कमालीचे यशस्वी ठरले. ‘कोळी समाजाचे ‘गोत्र’ हे ‘वाल्मिकी’ होय ! हे नि. ह. रेवंद यांचा लेख माहितीप्रदान व वाचनीय आहे. कोळी समाज हा धार्मिक असून देवभोळा स्वभावाचा आहे. कोळी समाजाचा आद्य पुरुष हा गुरु वाल्मिकी हे कोळी होते. त्यामुळे कोळी समाजातील लोकांनी आपले गोत्र ‘वाल्मिकी’ हे जाहीर करावेत. ‘अमेरिकेतील वीकएंड’, ‘ताडोबाच्या जंगलात’ ‘समाज जीवनातील अंतरंग’ आदी लेखही वाचनीय आहेत.
संपादक :अमोल सरतांडेल
पाने : ११२
किंमत : ६० रु.

शतायुषी
सर्वसामान्यांमध्ये आरोग्याबाबत जागृती निर्माण करणारा ‘शतायुषी’चा आरोग्य विशेषांक आहे. यंदाच्या दिवाळी अंकात ‘शाळकरी मुलामुलींचे आजार, आरोग्य आणि अभ्यास’ या विषयाचे महत्त्वपूर्ण पैलू उलगडणारा एक विशेष विभाग आहे. या विषयांतर्गत शाळकरी मुलामुलींचे गंभीर आजार, मुलींचे विशेष आजार, ‘सेक्स एज्युकेशन’ची गरज, सुदृढ राहण्यासाठी मुलांचा आहार कसा असावा, मुलामुलींच्या वर्तवणूक समस्या, मुलं बिघडू नयेत यासाठी काय-काय करता येईल, मुलांच्या अभ्यासाच्या सवयी आणि कौशल्ये, आपल्या पाल्याचा सर्वागीण विकास कसा करता येईल, अशा अनेक विषयांची माहिती देशातील नामवंत डॉक्टरांच्या लिखाणातून मांडली आहे. ‘आजार आणि आरोग्य – एक मुक्त संवाद’ या विभागातील लेखमालेअंतर्गत मूल न होणा-या स्त्रियांसाठी ‘डॉक्टर मला बाळ हवंय!’ हा डॉ. अरविंद संगमनेरकर यांचा ‘ओव्ह्युलेशन स्टडी’वरील लेख मार्गदर्शनपर आहे. ‘डॉक्टरी सत्यकथा – दृष्टांत’ आणि ‘डॉक्टरी सत्यकथा – बिरादरी’ हे अनुक्रमे डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे लेख विशेष वाचनीय आहेत. भामरागडमधलं आदिवासींचं जीवन, त्यांना उद्भवणा-या आरोग्याबाबतच्या समस्या आणि या डॉक्टर दाम्पत्याला उपचार करताना आलेले थरारक अनुभव त्यांनी आपापल्या लेखांतून मांडले आहेत. डॉ. सुधांशू पटवारी यांचा ‘कॉँस्टिपेशन – एक अवघड दुखणं’ हा लेख, डॉ. राजीव सोमण यांचा ‘व्हायरस आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे होणारे आजार’, डॉ. अरविंद कोठे यांचा ‘जुनाट सर्दी-पडसं आणि होमिओपॅथिक उपचार’ हे लेखही माहितीपूर्ण आहेत.
संपादक : डॉ. अरविंद संगमनेरकर आणि डॉ. सौ. आशा संगमनेरकर
पृष्ठ संख्या : २२६
किंमत : रु. १२०/-

निर्भय राज्य
विविध कथा, लेख, अध्यात्माचा वेध, अर्थकारण, राजकारण, परीक्षण, नवे विचार आणि संकल्पनांनी सजलेला या वर्षीचा ‘निर्भय राज्य’ हा दिवाळी अंक वाचकांना विविध विषयांच्या माध्यमातून वास्तवाची ओळख पटवून नाविन्याच्या उंबरठय़ावर नेऊन ठेवणारा ठरतो. दिवाळी बरोबरच भविष्यातील महाराष्ट्र, स्त्रियांवरील अत्याचाराचा मागोवा घेऊन अंतर्मुख करणा-या घटना, एक पुरोगामी पाऊल, शिक्षणातली नवी क्रांती, डॉ. नरेंद्र दाभोलकर कृतीशील विचारवंत आदी लेखांचा सामावेश या अंकात महत्तवपूर्ण करण्यात आला आहे. माळीण गावातील निसर्ग तांडव वाचकांसमोर उभे करून भविष्यातील परिणामांचा वेध घेऊन समाजाला जागृत करण्याचा एक प्रयत्न करण्यात आला आहे. त्याचबरोबर सौंदर्य, मुलाखत, जागतिक व्यापार, शिक्षण, दैवगती, पुरोगामी पाऊल यासारख्या लेखांनाही या अंकामध्ये विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. वाचकांनी हा अंक जरूर वाचावा.
संपादक : शशिकांत कावले
पृष्ठे : १२०
मूल्य : १०० रुपये

त्रिकाल
‘त्रिकाल’या महिला विशेष दिपावली अंकात राजकारणापासून अगदी पोळी-भाजी केंद्रापर्यंत विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या कर्तुत्ववान महिलांचे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये लोकसभ अध्यक्ष सुमित्रा महाजन, गायिका देवकी पंडित, श्रुती सडोलीकर, उत्तरा केळकर, बेला शेंडे यांच्या सुरेल प्रवास तसेच ज्येष्ठ पत्रकार वैजयंती कुलकर्णी- आपटे आणि पर्यटन क्षेत्रातील उद्योजिका संगिता पाटील यांच्या यशाचे गमक उलगडले आहे. याशिवाय महिलांसंबंधीच्या विविध सामाजिक समस्यांवरही मान्यवर लेखिकांनी प्रकाश टाकला आहे. याखेरीज सौंदर्य, साज-श्रृंगार, स्त्री- आरोग्य, जुनी-नवी आभूषणे तसेच विविध प्रांतातील पाककृतींची रेलचेल आहेच.
संपादक : मनोज चमणकर
पृष्ठे : १२९
मूल्य : १०० रुपये

स्वागत दिवाळी अंकांचे 10

वेगळ्या विषयावरचा दामिनी
SCAN-141108-0005दामिनी या दिवाळी विशेषांकांत या वर्षी भुलभुलैया झटपट श्रीमंतीचा अशी टॅगलाईन आहे. मात्र या दिवाळी अंकात आर्थिक गणित वा झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग नसून भारतात झालेल्या काही घोटाळ्यांचा व एकंदरीतच अवैध मार्गाने पैसा कमावण्याच्या मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. भारत घोटाळेरत हा या अंकातला पहिला लेख असून यात गेल्या काही वर्षात झालेल्या कथित घोटाळ्यांचा वेध घेण्यात आला आहे. मात्र ही घोटाळ्यांची केवळ माहिती आहे. त्यामागच्या काही रंजक गोष्टी या घोटाळ्यांच्या विरोधातल्या आंदोलनांचा वगैरे यात वेध घेण्यात आलेला नाही. हा लेख जरी या दिवाळी अंकाचा मुख्य लेख असला तरी तो फारच त्रोटक स्वरूपात समोर येतो. दिलीप ठाकूर यांनी चित्रपटसृष्टीतल्या आर्थिक व्यवहारांवर लिहिलेल्या लेखात अनेक रंजक किस्सेही देण्यात आलेले आहेत. याशिवाय इतर लेख व कथा कविता या दिवाळी अंकात आहेत. नितीन पवार यांची सरान ही कथा मात्र त्याच्या नव्या फॉर्ममुळे अगदी आश्वासक अशी झालेली आहे. मुखपृष्ठावर दाखवण्यात आलेलं कृष्णविवर व त्यामध्ये असलेला पैसा हे सूचक आहे.
संपादक : शीतल करदेकर
पृष्ठे : ८२, मूल्य : ६०

अक्षरसिद्धी
SCAN-141108-0007बदलत्या जगाबरोबरच, बदलती माणसे, बदलत्या परंपरांचा विचार करता सुसंवाद, वाचनसंस्कृती कुठेतरी हरवत चालल्याचे निदर्शनास येते. मात्र दिवाळी अंकांच्या माध्यमातून हीच वाचनसंस्कृती ‘अक्षरसिद्धी’ दिवाळी अंकाच्या माध्यमातून जोपासली गेलेली दिसून येते. विवेकदीप, बांबूची महती, भारतीयत्वाचा अभिमान, जलप्रदूषण, म्हातारपणीच्या काठीचा बदलता विचार, मुक्त छंदातला मुक्त बाप आदी नव्या विचारांबरोबरच काव्योत्सवातून केली गेलेली शब्दांची उधळणही वाचकांना रममाण करणारी आहे.
सकारात्मक विचारांनी वाचकांना गुंगवून ठेवताना थोडक्यात पण महत्त्वाचे असे लेख अक्षरसिद्धीचे वेगळेपण जपणारे ठरतात. काव्य जगतातील चारोळ्या तसेच सूर्यास्त, जाते, जीवन एक संघर्ष आदी कवितांतून नात्यांबरोबरच संस्कृतीचा घेतलेला वेधही विशेष लक्षणीय ठरतो. दिवाळीच्या झगमगत्या दुनियेबरोबरच नवीन विचारांना दिलेली संधी ‘अक्षरसिद्धी’ दिवाळी अंकातून निश्चितच प्रभावी ठरणारी आहे.
संपादक : सुभाष कुदळे
पृष्ठे : ४४, मूल्य : ५१ रुपये

विश्वकर्मा पंचाल
SCAN-141108-0004आपली संस्कृती, संस्कारांचे शिंपण, परोपकार, विधी, शिक्षणाचा आढावा, सामाजिक संघटन, आरोग्य आणि स्त्रीशक्तीबरोबरच विविध तीर्थक्षेत्रांचा वेध घेऊन साकारलेला ‘विश्वकर्मा पंचाल’ हा दिवाळी अंक विविध विषय, विचार आणि मतांच्या जडणघडणीतून ख-या अर्थाने पूर्णत्वास गेला आहे. वाचकांना या अंकातून परिपूर्ण माहिती देण्याचा मानस खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.
या दिवाळी अंकातून रूढी परंपरा, युवा मंच एक जागर, आईवडील महान दैवत, आरोग्यम् धनसंपदा, श्रद्धा-अंधश्रद्धा, बालसंस्कार, मुली जगवा जीव वाचवा, स्त्रीशक्तीला सलाम आदी लेखांतून जोपासली गेलेली विचारधारा वाचकांना प्रभावित करणारी आहे. लेखकांनी आपल्या दर्जेदार लिखाणातून संस्कृती जोपासण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. आजच्या बदलत्या जीवनात मंगलविधींची यथोचित माहिती करून देणारा ‘समाजातील रूढी परंपरा एक चिंतन’ हा समाजभूषण शांताराम सागवेकर यांचा लेख आजच्या पिढीसाठी विशेष मार्गदर्शनपर आहे. नवीन विचारधारा, आध्यात्माबरोबरच संस्कृती आणि संस्कारावर दृष्टिक्षेप टाकून वाचकांना वाचनाचा आनंद देणारा विश्वकर्मा दिवाळी अंक आपलं वैशिष्टय ठळकपणे उमटवतो.
मुख्य संपादक : जयवंत देवरुखकर, संपादक : सुनील देवरुखकर
पृष्ठ : २००, मूल्य : २ रुपये

तरुण
SCAN-141108-0009‘तरुण’चा यंदाचा ४०वा दिवाळी अंक खुमासदार कथा, कविता यांनी भरलेला आहे. अंकाच्या सुरुवातीलाच माजी खासदार मनोहर जोशी यांनी विक्रमराव सावरकर यांच्याबद्दलच्या आठवणी जागवणारा लेख लिहिला आहे. स्वातंत्र्यवीर दि. विनायक दामोदर सावरकर यांच्या सूनबाई श्रीमती सुंदरताई विश्वास सावरकर यांची स्वातंत्र्यवीरांच्या आठवणीबद्दल अमेय गुप्ते यांनी घेतलेली मुलाखत या अंकाचे खास वैशिष्टय आहे. त्यानंतर ‘तरुण’ या दिवाळी अंकाची चाळीस वर्षाची वाटचाल संपादक सच्चिदानंद महाडिक यांनी त्यांच्या लेखातून सांगितली आहे.
या अंकात विश्वास (नि. श. गुळवणी), मंगलोरी कौलं ( अनिल जावकर), निळ्या आभाळाच्या छायेत (भालचंद्र गंद्रे), दिन दिन दिवाळी (स्मिता पाटील), हरिणीचे लग्न(जयंत रानडे), पायाचे दगड गोटे (करुणा म्हात्रे), तथास्तु (जयवंत कोरगांवकर) आदी कथा आहेत. याशिवाय पद्माकर सोमणे, जमील शेख, अशोक कुमावत, नंदकुमार मालाडकर, रमाकांत सामंत, संजय सागरे चारूलता कुलकर्णी, पल्लवी सरलष्कर-अष्टेकर, आशा गोडाड यांच्या कथाही या अंकात आहेत. याशिवाय रवींद्र कोरे, उमाकांत कामत, दत्ता सावंत, सुवर्णा जाधव, रमेशकुमार मेंगळे यांच्या कविता या अंकात आहेत.
संपादक : सच्चिदानंद महाडिक
पाने : १६०, मूल्य : ८० रुपये

महिलांची चळवळ मुक्ता
SCAN-141108-0008समाज, राजकारणातच नव्हे तर अगदी घराघरात स्त्रियांना मिळणारी वागणूक, तिला मिळणारे स्थान, दिल्या जाणा-या संधी आदी गोष्टींचा विचार करता पुरुषी मानसिकता बदलण्याची असलेली गरज हा विचार आपसूकच ‘महिलांची चळवळ मुक्ता’ या दिवाळी विशेषांकातून उमटताना दिसतो. कर्तृत्वशालिनी या विशेष लेखातून सिंधुताई सपकाळ, सुलोचना चव्हाण, माणदेशी महिला बँक, मुक्ता बर्वे आदींनी आपल्या आयुष्यातील प्रवासातून उभे केलेले जिवंत प्रसंग, जीवनातील संघर्ष, जबाबदा-या यशाचा गुरुमंत्र देतात. या विशेषांकामध्ये परिसंवाद, राजकारण काल आणि आज, वलयांकितमध्ये मोहन जोशी आणि राहुल सोलापूरकर यांचे अनुभव, का वाढतेय असहिष्णुता आदी लेखांतून वैचारिक गाभा परिपूर्ण जपला गेला आहे. तर अंकाच्या मुखपृष्ठातून उमटणा-या वास्तवाचा घेतलेला वेधही स्त्रीमुक्तीच्या पार्श्वभूमीवर समर्पक ठरतो. ‘महिलांची चळवळ मुक्ता’ हा अंक वाचनीय आहे. विविध विषयांचं मर्म जोपासण्याचा या अंकातून चांगला प्रयत्न करण्यात आला आहे.
संपादिका : शोभना देशमुख
पृष्ठे : ६४, मूल्य : ७० रुपये

साहित्य संगम
मयुरेश प्रकाशनच्या ‘साहित्य संगम’ या दिवाळी अंकात दरवर्षीप्रमाणे लेख, कथा कविता, विशेष परिसंवाद असा साहित्यिक फराळ आहे.
SCAN-141108-0006यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकींमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर केंद्रात भाजपची सत्ता आली. याचा आढावा घेणारा डी. डी. गोखले यांचा लेख ‘हा चमत्कार कसा घडला’ वाचनीय आहे. २००९मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुका आणि २०१४च्या निवडणुका यांचे विश्लेषण या लेखात करण्यात आले आहे. १९९८पासून मेळघाटमधील आदिवासींसाठी आरोग्याचे वरदान देणारे डॉ. आशीष सातव यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सांगणारा ‘मेळघाटातील धन्वंतरी’ हा लेख ललिता त्रलोक्य यांनी लिहिला आहे. पाकिस्तान व चीन हे देश सीमेजवळ भारताशी छुपे युद्ध किंवा शीतयुद्ध करीत असतात. या एकूणच परिस्थितीचा व या देशांच्या हालचाली व पुढील काळातील भारतापुढील आव्हाने याचा परामर्श घेणारा ‘पाकिस्तान, चीनचे भारताशी अपारंपरिक युद्ध’ हा लेख ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी लिहिला आहे. वसई विरार शहर महापालिकेच्या उपायुक्त संगीता धायगुडे यांनी अध्यात्म आत्मसात केल्यानंतर त्यांच्या विचार जाणिवांना कशा प्रकारे वेगळी झळाळी प्राप्त झाली हे ‘अध्यात्म’ या लेखातून सांगितले आहे.
याशिवाय दूरदर्शनचा पहिला जादूगार’ (शशिकांत काळे), लोकलची चौथी सीट (उमाकांत वाघ), पायगुण (मीनाक्षी अय्यंगार) यांचे लेखही अंकात आहेत. अभय गोखले यांनी घेतलेली अभिनेते रमेश देव यांची मुलाखतही वाचकांना नक्की आवडेल.
संपादक : उमाकांत वाघ
पाने : १०८, मूल्य : ७० रुपये

स्वागत दिवाळी अंकांचे 8

श्रावणी
SCAN-141101-0003दर्जेदार कथा, मन लुभावणा-या कविता, त्यातील नात्यांचा ओघ, वैचारिक लेखांतून केलं गेलेलं नात्यांचं शिंपण आणि स्वाद-आस्वादाबरोबरच कथांना अनुरूप अशा साकारलेल्या रेखाचित्रांनी या वर्षीचा ‘श्रावणी’ दिवाळी अंक अगदी परिपूर्ण बनला आहे. या अंकातील श्रीकांत आंब्रे यांची कविता वास्तवाचा वेध घेऊन वाचनाचा स्वाद देणारी आहे. मराठी चित्रपट ‘कधी फंडा, कधी थंडा’ मधून दिलीप ठाकूर यांनी सिनेमा जगताचा घेतलेला वेधही वाचनीयच आहे. रमा माधव, चिंतामणी, कुटुंब, राखणदार आदी चित्रपटांच्या माध्यमातून सिने क्षेत्रातील अनेक किस्से त्यांनी उलगडवले आहेत. गायक किशोर कुमार यांच्या यशस्वीतेवर प्रकाश टाकणारा व त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा ‘किशोर कुमार – आराधना आधीचा व नंतरचा’ हा लेख वाचकांसाठी विशेष लक्षणीय आहे. ‘श्रावणी’ दिवाळी अंकाचं हे पाचवं वर्ष आहे. दर्जेदार लेखकांच्या दर्जेदार कथा, कवितांची साकारलेली रुपकं, उत्कृष्ठ मुखपृष्ठ आणि अंकातील रेखाचित्रांनी श्रावणी दिवाळी अंक विशेष लक्षणीय ठरतो.
संपादिका : सायली कदम,  पृष्ठ : ११०, मूल्य : ८०

अर्थविश्व
SCAN-141101-0005बँकिंग, विमा आणि गुंतवणूक यांसारख्या विषयांना वाहिलेले लेख यंदाच्या दिवाळी अंकामध्ये आहेत. अनेक मान्यवर अर्थतज्ज्ञांनी सर्वसामान्यांना समजेल अशी वापरलेली भाषा हे या अंकाचे वैशिष्टय म्हणावे लागेल. डॉ. वसंत पटवर्धन यांचा ‘राष्ट्रीयीकृत बँकांचा कायापालट’, डॉ. अनंत लाभसेटवार यांचा ‘भाववाढ नको, भाववाढ पाहिजे’, शशिकांत जाधव यांचा ‘भारतीय बँकांची पुनर्बाधणी’, राम सुब्रमणियम यांचा ‘अनिवासी भारतीयांची ठेव योजना’ या लेखांमुळे हा अंक अधिक वाचनीय झाला आहे. याबरोबरच देवदत्त धानोरकर यांनी घेतलेली एलआयसी नोमुरा म्युच्युअल फंडाचे सीईओ निलेश साठे यांची मुलाखत, ‘वयानुसार गुंतवणूक कशी असावी?’, ‘सीनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम’, ‘अपारंपरिक गुंतवणूक माध्यमे आणि त्यांचे निर्देशांक’, ‘आजची बचत, उद्याची वसुली’, ‘म्युच्युअल फंड’ यांसारख्या लेखांमुळे हा अंक माहितीपूर्ण झाला आहे. शिवाय ‘शेअर बाजार-जुगार? छे बुद्धिबळाचा डाव’ आणि मुंबई, पुणे आणि कोकण या भागांमधील मालमत्ता खरेदीविषयक मार्गदर्शक लेखही यात आहेत. याबरोबरच व्यंगचित्रांच्या माध्यमातून दैनंदिन आर्थिक बाबींवर मार्मिक भाष्यामुळे अर्थविषयक अंक हलका-फुलका करण्याचा स्तुत्य प्रयत्न झाला आहे.
संपादक : रमेश नार्वेकर, पृष्ठ : ११६, मूल्य : ६०

कोकणशक्ति
SCAN-141101-0004कोकणशक्ति या साप्ताहिक वृत्तपत्राचा चोविसावा दिवाळी अंक खुमासदार कथा, कविता यांनी भरलेला आहे. अंकाच्या सुरुवातीलाच मधु मंगेश कर्णिक यांची ‘समिधा’ ही कथा आहे. स्वातंत्र्य सैनिक आप्पा भिडे यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळात मिळणा-या पेन्शनबाबतची कैफियत कर्णिक यांनी या कथेतून मांडली आहे. मनोहर तळेकर यांची ‘शॉट कट ऑफ सर्जरी’ ही लघुकथा या अंकात आहे. रमेश राणे यांनी लिहिलेली ‘अखेरचा दिवस’ ही मुंबई परिसरात घडलेली एक थरारक आणि विस्मयचकित करणारी दर्जेदार रहस्यकथा हे या अंकाचे खास आकर्षण आहे. ‘आता क्रांती हवी क्रांती’ या राजकीय लेखात कांताराम धानमेहेर यांनी मतदार राजाला मतदानाचे महत्त्व सांगितले आहे. कोकणातील माणसांबद्दल सांगणारा ‘कोकणी माणूस’ हा लेख रजनी रमाकांत वैद्य यांनी लिहिला आहे. ‘चक्रव्यूह’ ही बाळ राणे यांनी लिहिलेली दीर्घकथा वाचकांना नक्कीच आवडेल. याशिवाय सूर्यकांत लक्ष्मण सावंत, मोहन साटम, अरुण भालेराव या लेखकांच्या कथा या अंकात आहेत. तर ज्योती राणे, स्नेहल सुहास शेवडे, ज्योतील गोसावी, मनोहर गोविंद तळेकर यांच्या कविताही या अंकात आहेत. या अंकातील रमेश केणी यांच्या वात्रटिका/कानपिचक्या वाचनीय आहेत. कोकणशक्तिच्या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ मनोवेधक आहे.
संपादक : बाळासाहेब सनये, पृष्ठ : ११६
मूल्य : १००

कलामंच
SCAN-141101-0002‘कलामंच’ या दिवाळी अंकात सुरुवातीलाच संपादिका हेमांगी नेरकर यांनी ‘वेध पुस्तकांचा’मध्ये डॉ. महेश केळुसकर यांच्या ‘झिनझिनाट’, अभिनेत्री स्पहा जोशी यांच्या ‘लोपमुद्रा’ आणि ज्योती कपिले यांच्या ‘मनमुक्ता’ या कविता संग्रहांचा ठाव घेतला आहे. चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरती प्रभू यांच्या साहित्य ठेव्याची यादीही अंकात समाविष्ट आहे. तसेच ‘विस्मृतीच्या माळेतील स्मरणमणी : दीपमाळ’ या लेखात आरती प्रभूंच्या साहित्यातील योगदानाबाबत अनुपम बेहेरे यांनी प्रकाश टाकला आहे. याशिवाय या अंकात आरती प्रभू, मंगेश पाडगांवकर, प्रवीण दवणे, डॉ. महेश केळुसकर यांसह अनेक कवींच्या कवितांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा पट खुद्द सईच्या तोंडून उलगडण्यात आला आहे.
संपादिका : हेमांगी नेरकर, पृष्ठ संख्या : १७६

भूमी सम्राट
SCAN-141101-0001भूमी सम्राट या दिवाळी अंकातून राजकीय, सामाजिक स्तरावरील वास्तवाचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भ्रष्टाचार, घोटाळे, गरिबी, श्रीमंती, वाढलेली महागाई, स्त्रियांना देण्यात येणारी समाजातील वागणूक आदींचा वेध घेऊन भूमी सम्राट या दिवाळी अंकातून अन्याय, अत्याचाराविरोधी आवाज उठविण्याचा चांगला प्रयत्न करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची ‘पारणे’ ही कथा पंढरपूरच्या विठूरायाच्या चरणी लीन करणारी आहे. त्याचप्रमाणे ‘मन उदास उदास, दया मरण द्या’ हा मनोरुग्णांच्या जीवनाची कहाणी सांगणारा लेख, बाळ राणे यांचा ‘माणुसकीचा मळा’ ही कथा, तसेच पश्चाताप, स्त्री असे जगतजननी आदी दर्जेदार साहित्य वाचकांच्या काळजाचा ठाव घेणारे आहे. एकंदरीतच वास्तवाचा वेध घेऊन दर्जेदार साहित्यिकांच्या साहित्याला स्थान देऊन साकारलेले भूमी सम्राटचे हे रूप वाचकांना निश्चितच पसंत पडेल याची खात्री वाटते.
संपादक : चंद्रकांत गोखले, पृष्ठे : ४८
मूल्य: ३०

स्वागत दिवाळी अंकांचे 7

साहित्य
SCAN-141030-0005साहित्य हा दिवाळी अंक आपल्या नावाप्रमाणेच भरगच्च मजकुराने भरलेला आहे. वै-याची रात्र (के. ज. पुरोहित), पाषाण (रेखा बैजल), जगणा-या मोहाचे आख्यान (नीलिमा भावे), आपली माणसं (उषा तांबे), विसर्जन (विजय खाडिलकर), तानी (म. वि. कोल्हटकर), पराभूत (गुरुनाथ तेंडुलकर) आदी कथा वाचनीय आहेत. मुलाखत या विशेष सदरामध्ये प्रतिभाशाली अभिनेत्री मृणाल कुलकर्णी विषयी लेख आहे. मृणाल कुलकर्णी यांनी नुकताच ‘रमा माधव’ हा ऐतिहासिक चित्रपट दिग्दर्शित केला. चतुरस्त्र अभिनेता सुबोध भावे याच्याविषयीची मुलाखत ही वाचनीय झाली आहे. अमोल बावडेकर या कलाकारानेही मराठी मालिका, चित्रपटात स्वत:चे आगळे स्थान निर्माण केले आहे. संगीत नाटक आणि वैविध्यपूर्ण अभिनयशैलीच्या जोरावर मराठी नाटक, चित्रपट, मालिकांमधून स्वत:चा वेगळा ठसा निर्माण करण्यात अमोल यशस्वी ठरला आहे, ‘श्रद्धांजली’ या सदरात शंकर वैद्य यांना अरुण म्हात्रे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. वैद्य सरांना मोठया विषयांचे आकर्षण नव्हते. कविता शिरताना ती मुंगीसारखी छोटया बिळातून घुसते आणि हळूहळू अख्खा बुंधा व्यापून टाकते असंच सराचं मत असावं. साधेपणा ही सरांची वैशिष्टय असले तरी त्यात एक ग्रेस होती. कवी म्हणून आपलं कवीपणा पुन्हा पुन्हा तपासणारा दुसरा कवी माझ्या पाहण्यात नाही. ते स्वत:लाच प्रश्न विचारीत. कवी आणि कवितांवर प्रेम हे त्यांचे मिशन होते. आयुष्याची समग्रता कवितेत उतरली पाहिजे हा मंत्र सरांनी आम्हाला दिला असे मत या लेखात अरुण म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.
या अंकात शिरीष पै, किशोर पाठक, उषा मेहता, भीमसेन देठे, महेश केळुसकर आदींच्या कविता वाचायला मिळतात. ‘गावचा रानमेवा’- अशोक बेंडखळे, गणपतीची शाळा- रश्मी कशेळकर, वयात काय आहे? सुधीर सुखटणकर आदी ललित लेख आहेत.
संपादक : अशोक बेंडखळे
पृष्ठे : १६८, मूल्य : १०० रुपये

SCAN-141030-0012उद्याचा मराठवाडा (संवादपर्व २०१४)
‘लोकशाहीतील माध्यमांची भूमिका’ याविषयी उहापोह करणारा दिशादर्शक लेखसंवाद या अंकाचे ठळक वैशिष्टय आहे. प्रकाश बाळ, प्रवीण बर्दापूरकर, सुरेश द्वादशीवार, राही भिडे, जयदेव डोळे, संजय आवटे, निशिकांत भालेराव, टेकचंद सोनवणे, श्रीरंजन आवटे आणि अन्य मान्यवर या लेखसंवादात लिहिते झाले आहेत. शिवाय, ‘गाईड’विषयी विजय पाडळकर यांचा लेख, अमर हबीब, बब्रूवान रुद्रकंठवार व अन्यांच्या कथा, गुलजार यांच्या अनुवादित कवितांसह नामवंतांच्या कविता असे साहित्य या अंकात आहे.
संपादक : राम शेवडीकर
पृष्ठे : १७६, मूल्य – १२५ रुपये

साप्ताहिक युगांतर
SCAN-141030-0004साप्ताहिक युगांतरचा यंदाचा दिवाळी अंक हा नेहमीप्रमाणे विविध विषयांनी नटलेला आहे. ‘मोटारगाडया’ या अच्युत गोडबोले यांच्या लेखात मोटारगाडीच्या एकूणच संस्कृतीचा आढावा घेण्यात आला आहे. जातीअंताची लढाई, बाबासाहेबांनी केलेले धम्मचक्र परिवर्तन व त्याचा परिणाम याची चर्चा दत्ता भगत, अविनाश डोळस, बी. व्ही. जोंधळे आणि गोविंद पानसरे यांनी त्यांच्या लेखात केली आहे. शेतकरी आंदोलने व त्यांच्या परिणामाची चर्चा रमेश पाध्ये यांनी त्यांच्या लेखातून केली आहे. ‘छावणी हलते आहे’ या अर्जुन डांगळे यांच्या गाजलेल्या काव्यसंग्रहाची निर्मिती कथा सांगणारा ‘छावणी’ साकारतानाची गोष्ट हा लेख या अंकात आहे. संजीव खांडेकर यांनी ज्येष्ठ साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांच्यावर लिहिलेला लेख वाचकांना नक्की आवडेल. निशिकांत ठकार यांनी ‘साहित्य का हिन्दी मराठी अनुबंध’ या निबंध संग्रहात लिहिलेल्या ‘अरुण कोलटकर का स्मरण’ या लेखाचा प्रदीप नेरुरकर यांनी केलेला अनुवादित लेख यंदाच्या युगांतरमध्ये वाचायला मिळेल. ‘ब, बळीचा’ या राजन गवस यांच्या गाजलेल्या कादंबरीवर विस्तृत चर्चा करणारा लेख आसाराम लोमटे यांनी लिहिला आहे. यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले सतीश काळसेकर यांच्या ‘विलंबित’ या काव्यसंग्रहाची समीक्षा या अंकात आहे. हिंदीतील ज्येष्ठ कवी अशोक वाजपेयी यांच्या कवितांचे विश्लेषण करणारा लेख वसंत आबाजी डहाके यांनी लिहिला आहे. राजा शिरगुप्पे यांनी त्यांच्या लेखात राजन गवस व कृष्णात खोत या ज्येष्ठ-तरुण लेखकांच्या साहित्यातील समान सुत्रांची सांगड घातली आहे. याशिवाय चित्रा बेडेकर, जयदेव डोळे, जयप्रकाश सावंत, प्रतिमा जोशी, पंकज करूलकर, प्रा. रणधीर शिंदे, आनंद विंगकर आदींचे लेख व कथा या अकांत आहेत.
संपादक : डॉ. भालचंद्र कानगो
पृष्ठे : २५६, मूल्य : १०० रुपये

रणांगण
SCAN-141030-0002साहित्याबरोबरच राजकारण, समाजकारण, नाटक, सिनेमा ते संगीत अध्यात्मापर्यंत विविध विषयाना अनुसरून कथा, कविता, कादंबरी, मुलाखती, परिसंवादाबरोबरच विशेष लेखांची जोड देऊन मुलभूत विचारानी सजलेला ‘रणांगण’ हा दिवाळी अंक वाचकांच्या वैचारिक ज्ञानात मौलिक भर टाकणारा आहे. मनाला अस्वस्थ करणारी, अंतरी सलणारी गोष्ट लेखणी रुपाने प्रगट करण्यासाठी ‘बोचते काही मनाला जीवघेणे’ हा विषय रणांगणने देऊन विविध विषयांतून उलगडलेले मनाचे नानाविध कप्पे लेखकांच्या लेखनशैलीने वाचकांना निश्चितच लुभावणारे ठरणार आहेत. या अंकामध्ये ‘जनाबाई मी आणि भाऊ’ हा योजना शिवानंद यांचा लेख, ‘एकाकी योद्धा’ हा अलका मांडके यांचा लेख त्याचबरोबर राम पटवर्धन एक ऋषी हा अरुण म्हात्रे यांचा लेख तसेच कथा, परिसंवाद, मुंबईच्या लेकीमधून अंतरात सल साठवून बाहेरच्या जगात वावरताना ओठावर हसू आणून पोटासाठी कष्ट करणा-या स्त्रियांची अनेक रुपे आदी साहित्य जगण्याची नवी उमेद आणि वाचनाची प्रेरणा जागविणारे आहेत. या अंकातील कवितांचा अस्खलित नजराणाही या दीपोत्सवाची शान वाढवणारा आहे.
संपादक : डॉ. अविनाश गारगोटे
पृष्ठे : २१६, मूल्य : ११० रुपये

तारांगण
SCAN-141031-0003मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील माहितीचा खजिना तारांगण या दिवाळी अंकात आहे. ‘गोष्ट शशांकच्या जडणघडणीची’ या लेखामध्ये ‘होणार सून मी ह्या घरची’ मधील प्रमुख अभिनेता शशांक केतकर याची माहिती, ‘संवाद माई आणि मेघना’चा या विशेष लेखात सुकन्या मोने आणि प्राजक्ता माळी यांच्यातील संवाद, ‘एसआरकेच्या कारकिर्दीची ज्युबिली’ या लेखात सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानच्या २५ वर्षातील अभिनय कारकीर्दीची माहिती आहे. ‘माझ्या आयुष्यातील नवदुर्गा’ या आदेश बांदेकर यांच्या लेखात आयुष्याला दिशा देणा-या महिलांविषयी त्यांनी विस्तृत लिहिलं आहे. रोहिणी हट्टंगडी, ‘तीन दशकांचा प्रशांत प्रवास’ हा प्रशांत दामले यांचा लेख, अमृता खानविलकर यांचे लेख वाचनीय आहेत. ‘दोस्ती : पडद्यावरचे मानवतेचे महाकाव्य’ या लेखात ‘दोस्ती’ या हिंदीतील अजरामर चित्रपटाचा उहापोह केला आहे. गीतकार गुरु ठाकूरविषयीचा विशेष लेखाबरोबरच, ‘कलाकार रांगोळी लेख’, ‘‘अविनाश-विश्वजीत ‘टॉप गिअर’मध्ये’’, ‘बीईंग वुमन!’ – प्रसाद ओक-पुष्कर श्रोत्री आदींचे लिखाण अंकात आहे.
संपादक : मंदार जोशी
पृष्ठ : १३०, किंमत : रु. १००/-

प्रिय मैत्रीण
SCAN-141031-0004कथा आणि कवितांबरोबर ‘रंग माझा वेगळा’ या ललित लेखांतून विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे वेगवेगळे छंद आणि सहसा लोकांना माहीत नसलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वांच्या पैलूचा आढावा या विभागात घेण्यात आला आहे. यात स्वरलता लता मंगेशकर यांना फोटोग्राफीच्या आणि चित्रकलेच्या छंदाबद्दल, आशाताईंच्या रुचकर आणि चवदार स्वयंपाकाबद्दल, माजी मिस इंडिया आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वरूप संपत यांनी विशेष मुलांसाठी करत असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती मिळते. स्मिता जयकर यांची ओळख अभिनेत्री म्हणून असली तरी वैयक्तिक जीवनात अध्यात्माला वाहून घेतलेल्या जयकर यांची एक वेगळी ओळख पटते. तसंच निवेदिता सराफ, प्रा. प्रवीण दवणे, डॉ. सलील कुलकर्णी, कवी-लेखक चंद्रशेखर जोशी, डॉ. संदीप केळकर यांच्या आगळ्यावेगळ्या छंदाविषयी माहिती मिळते. वेगळाच ध्यास घेतलेल्या अनुताई प्रभूदेसाई, मेनन कुटुंबीय आणि प्राची दुबळे यांचा वेगळ्या वाटेवरील प्रवास इतर महिलांसाठी, मैत्रिणींसाठी प्रेरणादायी आणि उत्सुकता निर्माण करणारा आहे. त्याचबरोबर रेसिपी, रांगोळी, राशिभविष्य आणि व्यंगचित्रांची मेजवानीही सोबत आहेच.
संपादक : वर्षा सत्पाळकर
पृष्ठ : १६०, मू्ल्य : रु. १२०/-

आपला परम मित्र
SCAN-141031-0002दर्जेदार मजकूर देणा-या काही मोजक्या अनियतकालिकांमध्ये ‘आपला परम मित्र’चा समावेश होतो. लैंगिक भावभावनांची चिकित्सा हा अंकाचा मुख्य विषय आहे. ‘कामभावनेविषयीचा दृष्टिकोन : काल आणि आज’ हा या विशेषांकाचा मुख्य विषय आहे. अगदी शेकडो वर्षापासून साहित्य, शिल्पकला तसेच विविध माध्यमातून लोकांसमोर कामभावना प्रकट होत आली आहे. या कामभावनेची सगळयाच अंगांनी चिकित्सा करणारे लेख यात आहेत. वात्सायनाआधीचे कामशास्त्रासंबंधित आचार्य (प्रा. गिरीश जोशी), महर्षी वात्सायन आणि त्यांचे कामशास्त्र : एक परिचय (अतिथी संपादक मनोज आचार्य), लैंगिक मूल्यांचे अवमूल्यन : कारणे आणि विश्लेषण (प्रवीण पाटकर), आज शालेय स्तरावर सुयोग्य लैंगिक शिक्षण का जरुरीचे आहे? (डॉ. अशोक कोपर्डे) आणि संगणकीय अश्लील कामसाधना.काल नव्हतीच, आज बोकाळली आहे आणि उद्या? (प्रशांत तारे) यातून लैंगिक भावनेची भूत, वर्तमान आणि भविष्यकाळातील वाटचाल अधोरेखित केली आहे. कथा, अनुवादित कथा आहेतच पण त्याचबरोबर १९व्या, २० शतकातील पुण्यातील संगीत रंगभूमी (रामकृष्ण बाक्रे), सिनेमातले ‘किलोस्कर’ (बाबू मोशाय), आशाताईंवरील व्हर्सटॅलिटी : दाय नेम इज आशा हा सुनीता तारापुरे यांचा लेख, गिरीश कर्वे यांनी त्यांच्या सहकारी मित्राबद्दल लिहिलेला ‘अजब सिनेमा गजब माणसे’ हा लेख मनाला चटका लावून जाणारा आहे. कोकणातील लोकगीतांची परंपरा सचित्र स्वरूपात उलगडून दाखवली आहे रश्मी कशेलकर यांनी. विविध विषयांचा अंकांत समावेश करताना योग्य तो समतोल साधला आहे.
संपादक : माधव जोशी
पाने : १६२ , मूल्य : १००

स्वागत दिवाळी अंकांचे 5


उल्हास प्रभात
जीवनात विविध पातळय़ांवर संघर्ष करणा-या प्रत्येकाला अंधारातून उजेडाकडे नेणारी दिवाळी. विचारांचा उजेड देऊन समृद्ध जीवन करणारी दिवाळी, असेच दीपावलीचे वर्णन करता येईल. हाच प्रकाशमय विचार घेऊन आगळय़ा साहित्यसंपदेचा फराळ वाचकांसाठी ‘उल्हास प्रभात’ घेऊन आला आहे. मुले जन्माला आली की, प्रत्येक आई-वडील आपापल्या मुलांवर आपापल्या परीने संस्कार करण्याचे प्रयत्न करतात. याच संस्काराविषयी ‘मुलांवरील संस्कार’ या सातवीतील विद्यार्थ्यांने मांडलेला विचार बरंच काही सांगून जातो. स्त्री-पुरुष समानता कितीही मानत असली तरी समानता नाहीच. हे ठासून सांगणारा ‘आजच्या काळाची स्त्रियांची स्थिती’ हा लेख आजही अंधारात चाचपडणा-यांच्या डोळय़ांत अंजन घालणारा आहे. समाजातील अपंगांचा प्रश्न, सुंदर कोकण, आयुष्याचे घडय़ाळ, सकारात्मकतेचे जीवन आदी विषयांना केलेला स्पर्श वाचकांसाठी नवीन दिवाळी पहाट आहे.
संपादक : गुरुनाथ बनोटे,  
पाने : ११७, मूल्य : ७० रुपये


चंद्रकांत
चार संपूर्ण कादंब-या, चौकटी, कादंबरीच्या बदलत्या स्वरूपाबद्दल मीमांसा करणारे विशेष लेख असा फराळ वाचकप्रिय चंद्रकांतच्या यंदाच्या दिवाळी अंकात आहे. भालचंद्र देशपांडे, अरुण हेबळेकर, माधुरी तळवलकर आणि विभूती नारायण राय यांची चंद्रकांत भोंजाळ यांनी अनुवादित केलेली कादंबरी अशा चार कादंब-या या अंकात आहेत. बाबू मोशाय यांचा ललिता पवार यांच्यावरील परिचयात्मक लेख या अंकात आहेत.
संपादक : नीलिमा राजेंद्र कुलकर्णी
अतिथी संपादक : मनोज आचार्य,
 पृष्ठे : २१९, मूल्य: १७५ रुपये

महानगरी वार्ताहर
वैचारिक लेख, प्रहसन, विनोदी कथा, प्रासंगिक लेख, रहस्यकथा, अनुवादित कथा, कविता अशा दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण साहित्याने अंक नटला आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तारेय शेकटकर यांचा ‘दहशतवाद्यांचे टार्गेट मुंबई’ तसेच डॉ. प्रमोद पाठक यांचा ‘मुस्लीम समाजाकडून धर्मसंबंधातील अपेक्षा’ हे संरक्षण आणि मुस्लीम समाजाला विचार करू लावणारे लेख आहेत. त्याचबरोबर भा. ल. महाबळ यांची ‘कळा या लागल्या देहा’ ही विनोदी कथा, दिलीप ठाकूर यांचा ‘सिनेसृष्टीचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध’ आणि वसंत जोशी यांचा ‘हीरक महोत्सव गीत रामायणाचा’ हे लेख अतिशय वाचनीय झाले आहेत.
कार्यकारी संपादक : शरद मेस्त्री,
पाने : २१० किंमत : १०० रुपये


दर्याचा राजा
कथा, कविता आणि लेख यांनी भरपूर असा हा अंक आहे. शिवाय, आरोग्य, सिनेमा, क्रीडा, नाटक, भक्तिपर लेखही अंकात आहेत. ज्योतिषाविषयीही एक विशेष लेख असून मासळी आणि मत्स्योत्पादनाविषयी मार्गदर्शनपर लेख अंकात आहेत.
संपादक : पंढरीनाथ तामोरे,
पृष्ठे : २०० मूल्य : ५० रुपये

आश्लेषा
मुखपृष्ठापासून लक्षवेधी अंकांमध्ये या अंकाचीही गणना करावी लागेल. कथा, अनुवादित कथा, मुलाखती, लेख, सिनेमा, साहित्य, संगीत, नाटक, मराठी कथा, माहिती युग यांच्या अनुषंगाने बदलत्या परंपरांचा वेध घेणा-या लेखांचा विभाग, कविता, व्यंगचित्रं असं भरपूर साहित्य या अंकात समाविष्ट आहे. सत्यजित राय यांची अनुवादित कथा, केनिया पर्यटनाची माहिती देणारा लेख, ग्रंथालीची त्रिमूर्ती हा विशेष लेख, व्यवसायाविषयी बोलते झालेले नामवंत याचबरोबर राशीभविष्यही अंकात देण्यात आले आहे.
संपादक : अशोक तावडे, कार्यकारी संपादक : अजित आचार्य,
पृष्ठे : २१६, मूल्य : ११०

Dnyaneshwariआरोग्य ज्ञानेश्वरी!
आपल्याला नेहमीच काळजी वाटते, असा विषय म्हणजे देशाची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था! एखाद्या अनोळखी, परंतु जीवघेण्या आजाराची साथ एखाद्या अचानक आलेल्या वादळसारखीच असते. अशी अनेक वादळं आज आपल्या आरोग्याची वाट लावत आहेत. या सगळय़ाची लक्षणं मात्र आपल्याला आपल्या बिघडलेल्या जीवनशैलीतच सापडतील. आज चाळिशीनंतर होणारे आजार आपल्या पिढीत २५-३०शीतच दिसू लागले आहेत. या रोगांना समर्थपणे तोंड देण्यासाठी आपल्याला युद्ध पातळीवर काही करावे लागेल. पण नेमके काय करावे लागेल.. याचच धांडोळा ‘आरोग्य ज्ञानेश्वरी’ या दिवाळी अंकातून घेण्यात आला आहे. ‘क्रीडा वैद्यक’, ‘कृष्ण कथा’तून मुलांवर संस्कार घडवण्याचा प्रयत्न आहे. मुलांचे अभ्यासाकडे नेहमीच दुर्लक्ष होते, मात्र अशा मुलांना ‘कमी वेळात जास्त अभ्यास करायची जादू’ या अंकात सापडेल. जीवनात यश मिळवायचे तर सशक्त मन हवे आणि हे मन तयार करायचे तर या अंकातील ‘यशस्वी व्हा’सारखा मंत्र नाही. सोबतच ‘मधुमेह’, ‘मधुमेह आणि स्त्री’ ‘मधुमेहात पायांची घ्यायची काळजी’, ‘अन्न विषबाधा’, ‘लठ्ठपणा’ आणि दातांविषयी सर्व काही देण्याचा या अंकाचा प्रयत्न आहे.
संपादक : डॉ. हेमंत जोशी
पाने : १६०,   मूल्य : १२० रुपये


paavoolपुढचं पाऊल
आधुनिक जगाबरोबरच बाजारही बदलले आहेत. रस्त्यावर मिळणारा कांदा-बटाटा आता गारेगार मॉलमध्ये मिळू लागला आहे. मॉलमध्ये खरेदी करणे आता गरजेपेक्षाही ‘स्टेटस सिम्बॉल’ बनले आहे. तरीही घराजवळच्या बाजाराचे महत्त्व कमी झालेले नाही. बाजाराचा विविधांगी अभ्यास करणारा ‘पुढचं पाऊल’चा दिवाळी अंक अत्यंत विशेष आहे. मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी ‘बाजार’ या विषयावरील लेखात मॉलपेक्षा नेहमीच्या दुकानदारांकडे घेणे किती योग्य असते याची माहिती दिली आहे. ‘बाजार जगण्याचा.. पाहण्याचा आणि गावोगावचा ! !’ या लेखात सध्याच्या मार्केटिंगच्या पद्धतीची तपशीलवार माहिती दिली आहे. गरजेच्या वस्तूंपेक्षा अशा ‘पाहून प्रेमात पडून खरेदी केलेल्या’ वस्तूंची उलाढाल जास्त आहे. ‘सिनेमाच्या बाजारा’चे मार्केट झाले.. या दिलीप ठाकूर यांच्या लेखात चित्रपटसृष्टीच्या बाजाराचे गणित मांडले आहे. ‘तमाशाचा बाजार’ या लेखात बदलत्या अर्थकरणानुसार आपलं रूप बदललं आहे. पारंपरिक कलेकडून तो आधुनिक बनला आहे. ठिकाण बदलली तरी लावणीची श्रंगारिक नशा मात्र तशीच राहिली. मात्र तमाशातील कला मात्र मरत गेली. ‘कवितेचा बाजार’ या लेखात प्राध्यापक विसूभाऊ बापट यांनी कवितांच्या बाजाराची माहिती दिली आहे. ‘जाहिरातीतून मांडला जाणारा ‘स्त्री देहाचा’ बाजार या लेखात जाहिरातीतील स्त्रियांचे दर्शन घडवले आहे. या लेखांबरोबरच ‘शिक्षणाचा बाजार’, ‘नशेचा बाजार’, ‘वैद्यक क्षेत्रातील बाजार’ ‘आडनावांचा बाजार’, ‘लग्नाचा बाजार’ आदी लेख वाचनीय आहेत. त्याचबरोबर व्यंगचित्र, आठवडे बाजार, कथा, कविता आदींनी हा अंक सजला आहे.
संपादक : ऋतुजा (क्षमा) रा. पोवळे
पाने : १७६,   मूल्य : ८० रुपये


Sohalaआनंदाचा सोहळा
कथा स्पर्धेची आपली परंपरा सांभाळत ‘आनंदाचा सोहळा’चा दहा दिवाळी अंक बाजारात आला आहे. नवोदितांना प्रोत्साहान देण्यासाठी नव्या लेखाकांच्या कथांना स्थान देत असतानाच प्रतिथयश लेखकांचे साहित्यही यात समाविष्ट करण्यात आले आहे. शशिकांत काळे, नि. श. गुळवणी, अरविंद कटकधोंड, राकेश खेडकर यांच्या साहित्याने अंक सजला आहे. छोटय़ा पडद्यावरील दिवाळी हा संजय घावरे यांचा लेख उत्तम जमला आहे. त्याशिवाय ह.भ. प. दादा महाराज मोरे आणि एकंदरच मोरेमाऊली समाजाच्या कार्याची ओळख करून देणारा ह.भ.प. जगदीश सिंह यांचा तसेच गायनाचार्य ह.भ.प. हरीभाऊ महाराज िरगे यांच्या कार्याची ओळख करून देणारा शामसुंदर सोन्नर यांचा लेख या अंकाचे अध्यात्मिक मूल्य जपणारा आहे. प्रदीप म्हापसेकर यांच्या रेखाचित्रांनी अंकाची शोभा अधिकच वाढवली आहे. त्याशिवाय वात्रटिका, काव्य सोहळा ही मनोरंजानची मेजवाणी आहेच.
संपादिका : जान्हवी घावरे
पाने : १२४,   मूल्य : १००

Tonicटॉनिक
कृ. ल. मानकर यांचा टॉनिक या नागरिक शास्त्र विशेषांक छोटय़ा दोस्तांना ख-या अर्थाने ‘टॉनिक’ देणारा आहे. समाजात, सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे, वावरावे याचे ‘टॉनिक’ या अंकाच्या माध्यमातून सहज मिळू शकेल. विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षणही देण्याचा अनोखा प्रयोगही अंकात करण्यात आला आहे. तसेच डॉ. विजया वाड, शिरिष पै, भा.ल. महाबळ, सिंधुताई सपकाळ, डॉ. माधवी वैद्य, निशिगंधा वाड, प्रा. अरविंद दोडे, विठ्ठल कामत, विजयराज बोधनकर, यशवंतराव गडाख, अनिता पाध्ये अशा अनेक ज्येष्ठ मान्यवरांच्या ५९ कथा, कवितांचा अंकात समावेश आहे. शिवाय जयवंत काकडे यांची चिमटे काढणारी व्यंगचित्रे, विनोद, सुविचार आहेच. थोडक्यात विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लागून त्यांना साहित्याच्या विविध अंगांची ओळख होण्यास हा अंक उपयुक्त निश्चित उपयुक्त ठरेल.
संपादक :  कृ. ल. मानकर
पाने : २००,   मूल्य : १०० रुपये

स्वागत दिवाळी अंकांचे 5

स्वागत दिवाळी अंकांचे

Maifalबाल मैफल
हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक मराठी चेह-यांनी बस्तान बसवलं आहे. त्यातही दिग्दर्शक म्हणून या सृष्टीत आपलं बस्तान बसवणं तसं अवघडच. या मायावी नगरीत अनेक आघाडीच्या कलाकारांबरोबर भव्य-दिव्य निर्मितीसाठी नावाजलं गेलेलं नाव म्हणजे आशुतोष गोवारीकर. ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘खेले हम जी जान से’यासारख्या लोकप्रिय चित्रपटांचा दिग्दर्शक असलेला आशुतोष गोवारीकर आता एक नवी खेळी खेळत आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सुरु होणा-या ‘एव्हरेस्ट’ या भव्य मालिकेची निर्मिती तो करतोय. त्याच्या या नव्या साहसाविषयी व आतापर्यंतच्या त्याच्या प्रवासाविषयी त्याच्या बरोबर मारलेल्या गप्पांचा हा गोषवारा आजची बालमनं वाचनापासून ख-या अर्थाने दुरावली जात असताना ‘बालमैफल’ हा दिवाळी अंक आपल्या साहित्याच्या अनोख्या नजराण्याने बच्चे कंपनीला साद घालणारा ठरणार आहे. छोटय़ा दोस्तांसाठी विशेषत: मराठी, हिंदी, आणि इंग्रजी भाषेतून सजवलेला बालमैफल दिवाळी अंक हा चित्र, कथा, कविता, शब्दकोडी, बोधपर कथा, विनोद आणि विज्ञान आदी उपयुक्त माहितीच्या माध्यमातून बच्चे कंपनीला अगदी वेड लावणारा आहे. घर अंगणापासून पर्यावरण, इतिहास, मजेदार कविता ते मंगळ मोहीमेच्या यशाचं रहस्य सांगणारा शुभ मंगल सावधान हा लेख बालमनावर विशेष बिंबणारा आहे. मराठीतील दिवाणी चिमणी, आजीची प्रतिस्पर्धी, मूर्तीचे रहस्य , फुलपाखराचे बोल, हुंडा एक दुष्ट प्रथा, प्रदुषण व त्याचे दुष्परिणाम, हिंदीतील मंगलमय अभियान, नागकन्या का उपहार आदी बरोबरच इंग्रजीतील द नोबेल पिपल, माय हॉबी, धोंडो केशव कर्वे आदी लेख, कथा बालमनावर पगडा बसविणा-या असून अंतरी वाचन संस्कृती जागविणा-या आहेत.
संपादक: कुमार कदम,
पृष्ठ: १५२, मुल्य: ५० रुपये

Zhunjaarमहामुंबई झुंजार
२०१४ मध्ये पार पडलेली १६ वी लोकसभा निवडणूक ही संपूर्ण देशाला कलाटणी देणारी ठरली. त्यामुळेच महामुंबई झुंजार या दिवाळी अंकामध्ये आत्तापर्यंत झालेल्या सर्वच लोकसभा निवडणुकांचा लेखा-जोखा मांडणारा प्रदीर्घ लेख दिला आहे. भारताच्या ६७ वर्षाच्या राजकीय प्रवासात अनेक राजकीय, सामाजिक, धार्मिक, जातीय, भाषिक संघर्ष अथवा राज्यीय मतभेद झाले असतानाही भारतीय मतदारांनी आपला मतदानाचा हक्क सांभाळत भारतीय लोकशाही टिकवून ठेवली. येथे सातत्याने निवडणुकांच्या माध्यमातूनच सतापरिवर्तन घडत आले. अशा १९५२ पासून ते २०१४ पर्यंत आतापर्यंत झालेल्या १६ लोकसभा निवडणुकांची इत्यंभुत माहिती या लेखातून देण्यात आली आहे. लेखाच्या सुरवातीला मे २०१४ मध्ये झालेल्या १६ व्या लोकसभेचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानंतर स्वंतंत्र भारतातील निवडणुकांची पूर्वतयारी कशी होती याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर १९५१-५२, १९५७, १९६२, १९६७, १९७१, १९७७, १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६, १९९८, १९९९, २००४, २००९ या साली झालेल्या लोकसभा निवडणुकांचा संक्षिप्त आढावा घेण्यात आला आहे. एकुणातच पंडित जवाहरलाल नेहरुंपासुन ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या सर्व पंतप्रधानांबद्दल सांगणारा असा हा लेख आहे. याशिवाय या दिवाळी अंकामध्ये कथा विभागामध्ये तुम्हाला काही बहारदार कथा वाचायला मिळतील.
संपादक : विजय सामंत,
पाने : ९३, किंमत : ६० रूपये.

Bhakti Sangamभक्तिसंगम
दिवाळी हा सण दिव्यांचा, आनंदाचा उत्साहाचा सण म्हणून ओळखला जातो. परंतु, दिवाळी हे भक्तिपर्व देखील आहे. कारण अनेक साधक लक्ष्मीपूजन आणि दिवाळीच्या पाडव्याचे औचित्य साधून काही साधनेला आरंभ करतात. साधक आणि भक्तांच्या आध्यात्मिक भूकेचा विचार करून संपादक सुधाकर रावजी सामंत यांनी भक्तीसंगममध्ये लेखांची निवड केली आहे. अंकामध्ये अनेक आध्यात्मिक अभ्यासकांच्या लेखांबरोबरच देशभरातील संतांच्या कामगिरीवर प्रकाश टाकला आहे. याशिवाय काही महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांचीही माहिती
दिली आहे.
संपादक : सुधाकर रावजी सामंत,
पाने : ९८किंमत : ५० रुपये

Maifalसाहित्य मैफल
साहित्य मैफलचा यंदाचा दिवाळी अंकही खुसखूशीत फराळाप्रमाणेच वैचारिक फराळ घेऊन आला आहे. देशातील शास्त्रज्ञांनी नुकतीच फत्ते केलेल्या ‘मंगळयान’ मोहिमेवर या अंकात खोलवर प्रकाश टाकला आहे. तसेच ‘बचपन बचाव’ चळवळीच्या माध्यमातून बाल कामगारांची बाल मजुरीपासून मुक्तता करून त्यांच्या शिक्षणसाठी झटणारे नोबेल पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी आणि पाकिस्तानात मुलींच्या शिक्षणासाठी प्राण पणाला लावून तालिबान्यांच्या विरोधात संघर्ष करणारी मलाला युसुफझाई यांच्या कार्याचाही आढावा घेण्यात आला आहे. या शिवाय कथा, कविता, लेख यांचाही फराळ येथे आहेच.
संपादक : कुमार कदम,
पृष्ठ : १९२, किंमत : ९० रुपये

Lilaiलीलाई
दिवाळीचे पदार्थ म्हणजे तिखड, गोड, खुसखुशीतपणाचा मिलाफ. ‘लिलाई’ दिवाळी अंकही एकप्रकारे दिवाळीच्या फराळासारखाच आहे. ‘भ्रष्टाचाराचे मूळ कशात आहे?’ हा न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांचा लेख, ‘काश्मीरमधील धुमसते हिम’ हा फ्रान्सिस दिब्रिटो यांचा लेख तिखटाची भूमिका पार पडतात. तर पु.द. कोडोलिकर यांची कथा विनयभंगाची, माझ्या ‘अच्छे दिनां’ची गोष्ट ही नितीन मोरे यांच्यासह ह. शि. खरात आणि स्टॅन्ली घोन्सालविस यांच्या विनोदी कथांनी अंकाला खुसखुशीत केले आहे. ‘नाना’गिरी मध्ये गंगाराम गवाणकर नाना पाटेकरांच्या अभिनयातील ‘नाना कळा’ उलगडून दाखवल्या आहेत. परिसंवाद भाग आणि भाग दोनमध्ये चित्रपट क्षेत्राबरोबर अन्य  क्षेत्रातील कलाकारांनी संवाद साधला आहे. काव्यांगणमध्ये शिरीष पै, ना.धों महानोर, फ.मु. शिंदे यांच्या कवितांबरोबरच डॉ. महेश केळुस्कर यांची ‘दिल्या घेतल्या वचनांची’, साहेबराव ठाणगे यांची ‘झाडे’, शैलेंद्र शिर्के यांची ‘दंगल पेटते तेंव्हा’ या कविता वाचनीय आहेत. विजया राजाध्यक्ष, डॉ. विजया वाड, दत्ता केशव यांच्या सह अन्य लेखकांच्या कथांनी अंकाला अधिकच लज्जत आणली आहे.
संपादक : अनिलराज रोकडे
पाने : २०४ किंमत : १२५

स्वागत दिवाळी अंकांचे 4

धनंजय
शतकी परंपरा असणा-या दिवाळी अंकांच्या साहित्यप्रकारात अर्धशतकाहून अधिक काळ लक्षणीय योगदान देणारा धनंजय हा दिवाळी अंक यंदाही भयगूढ, विज्ञान, रहस्य, युद्ध, शोध, साहस अशा नानाविध कथांचा नजराणा घेऊन वाचकांसमोर हजर झाला आहे. ‘धनंजयकारांच्या स्मृतीनिमित्त’ हा विशेष लेख यंदाच्या धनंजयचे मुख्य आकर्षण आहे. धनंजयचे माजी संपादक दिवंगत राजेंद्र कुलकर्णी यांच्याबद्दलच्या आठवणी सांगणारा लेख राम देशमुख यांनी लिहिला आहे. ‘भिंतींना जिभाही असतात’ या विज्ञानकथेत डॉ. बाळ फोंडके यांनी गुन्हेगारांचा शोध लावण्यासाठी एका अनोख्या शक्यतेचा वेध घेतला आहे. माणसांना खूळ लावणारं झाड असू शकतं का? त्याची बुद्धिमत्ता, प्रतिभा झाड शोषून घेऊ शकतं का? या अनोख्या कल्पनांचा विस्तार करून माधुरी तळवलकर यांनी लिहिलेली ‘बुद्धिवृक्ष’ ही गूढकथा वाचकांना विचार करायला भाग पाडेल. एका लढाईची रोमहर्षक साहसकथा कर्नल जयसिंह पेंडसे यांनी सांगितली आहे. सखी बलसावर यांनी त्यांचं संशोधन पूर्णत्वाला नेण्यासाठी कशाप्रकारे सर्वस्व पणाला लावून संशोधन पूर्ण केलं हे ‘सूर्यसूक्त’ या विज्ञानकथेतून अरुण हेबळेकर यांनी सांगितलं आहे. भयगूढ कथांमध्ये शैलेंद्र शिर्के यांची ‘काजळमाया’, जयश्री कुलकर्णी यांची ‘रखवालदार’ या कथांचा समावेश आहे. गूढकथांमध्ये सागर कुलकर्णी यांची ‘नैनं दहती पावक:’, शरद दळवी यांची ‘मृत्यूपत्राचे गूढ’ या कथांचा समावेश आहे. एकुणातच पन्नास दर्जेदार कथा आणि चार माहितीपूर्ण लेख असा भरगच्च बौद्धिक फराळ वाचकांना या अंकातून मिळणार आहे.
संपादक : नीलिमा राजेंद्र कुलकर्णी
पाने : ३९२
किंमत : २०० रुपये

आपला डॉक्टर
वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विषय घेऊन त्याद्वारे वेगवेगळे आजार, त्याविषयीची अभ्यासपूर्ण माहिती व त्यावरील उपाय ‘आपला डॉक्टर’ या अंकात तज्ज्ञ डॉक्टर मांडत असतात. या वर्षीचा विशेषांक ‘संधिवात आणि अस्थिरोग’ या मुख्य विषयाशी निगडित आहे. यामध्ये ‘सांध्यांचे आजार का व कसे होतात?’ हा डॉ. व्ही. आर. जोशी यांचा तसेच ‘पाठीचा कणा – रचना आणि कार्य’ हा डॉ. अभय नेने यांचा तर ‘नेहमी आढळणारे सांध्यांचे विकार’ हा डॉ. एस. एम. हर्डिकर आणि डॉ. मदन हर्डिकर यांचे लेख खूपच माहितीपूर्ण आहेत. लहान मुलांनाही संधिवात होऊ शकतो, हे सांगणारा डॉ. गुरमित मंगत यांचा ‘लहान मुलांचा संधिवात’ हा लेख खरोखरच विचार करायला भाग पाडणारा आहे. डॉ. अश्विनी गांधी यांनी स्त्रियांसाठी प्रबोधनकर असा ‘ऋतुनिवृत्ती आणि ऑस्टिओपोरॉसिस’ हा लेख महिला वाचकांनी आवर्जून वाचण्यासारखा आहे.  शाम रानडे यांच्या ‘सांधेदुखी प्रतिबंधक आहार’ या लेखातून सांधेदुखी प्रतिबंधक आहार कसा असावा, याचं महत्त्व स्पष्ट केलं आहे. तर ‘हाडांचे आरोग्य आणि आहार’ या लेखातून डॉ. शीतल म्हामुणकर यांनी हाडांचं आरोग्य दीर्घकाळ टिकवण्यासाठी आहार कशाप्रकारचा असायला हवा, हे अधोरेखित केलं आहे. संधिवातावर कोणकोणते आयुर्वेदिय उपचार करता येतील, हे डॉ. ऊर्मिला थत्ते आणि डॉ. सुप्रिया भालेराव यांच्या लेखातून कळतं.
संपादक : शीतल मोरे
पाने : १०४
किंमत : ८० रुपये

असाही महाराष्ट्र
विविध जाती-धर्मातील दिवाळी, जात पंचायतींचा कहर तर आता तिस-या वर्षी विज्ञान, सामाजिक, विशेष लेख आणि व्यक्तिविशेष असे चार विषयांचे एकत्रित मिश्रण असलेला हा दिवाळी अंक आहे. विज्ञानवाटा विभागात मराठी विज्ञान परिषदेची ओळख (प्रदीप म्हात्रे), खेळण्यांचा जादूगर अरविंद गुप्ता यांच्यावरील लेख (शोभा भागवत), अरण्यानंद (हर्षल लोहकरे), परभणीच्या पालम तालुक्यातील केरवाडीमधील सामाजिक, आर्थिक विकास साधणारी एसईडीटी ही सामाजिक संस्था (मोतीराम पोळ) आणि महिलांना गणित समजत नाही, या गैरसमजावर प्रहार करणारा किशोर दरक यांचा लेख उल्लेखनीय आहे. समाजभान या विभागात विविध समाजोपयोगी कार्य करणा-या संस्था, प्रकल्प, उपक्रम आणि व्यक्ती यांची माहिती दिली आहे. विशेष आणि विविध विभागात पैसा, माध्यमं आणि राजकारण यावर ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचा लेख आहे. विद्यार्थी, शिक्षक तसेच माध्यम आणि प्रशासनात असलेल्या प्रत्येकाने वाचावा, असा हा अप्रतीम लेख आहे. व्यक्तिवेध विभागात लहान भूमिकांमधून मोठी मजल मारणाऱ्या चित्रपट कलावंत नवाजुद्दीन याचा प्रवास आहे. त्याचबरोबर नाथपंथी डवरी गोसावी समाजातील रामचंद्र भोसले यांची जीवनकथा, महिला शाहीर अनसुयाबाई शिंदे, झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन देणा-या संध्या चौगुले आणि स्वातंत्र्यसैनिक डॉ. टोणगावकर यांच्या समर्पित जीवनाबद्दल माहिती मिळते.
संपादक मंडळ : अमोल गवळी आणि अन्य मान्यवर
पाने : २००
किंमत : १५० रुपये

स्वागत दिवाळी अंकांचे 3 गुंफण

ऐक्य समूह
जडण-घडण
विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे संयुक्त व्यासपीठ असलेल्या जडण-घडणच्या या वर्षीच्या दिवाळी अंकात संरक्षण विषयक विशेष लखांचा समावेश आहे. तळ हातावर शिर घेऊन सीमेवर आपल्या देशबांधवांच्या रक्षणासाठी रात्रंदिवस खडा पाहरा देणाऱ्या आपल्या जवानांसाठी बऱ्याच वेळा युद्ध किंवा संघर्ष हा रोजचाच असतो. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, असं सैनिकाचं जीवन असतं. सैनिकांच्या या जीवन संघर्षावरचे आयुष्याचा गुरुमंत्र, एअर मार्शल भूषण गोखले, आकाशझेप विंग कमांडर राकेश शर्मा, राष्ट्र उभारणीत सैन्य दलातील भूमिका, ले.ज. दत्तात्रय शेकटकर, फिल्ड मार्शल माणेकशॉ, ले. ज. एस. पी. पी. थोरात, धुरंदर सेनानी समीर देशपांडे या लेखांसह मोहिते घराण्याची शौर्य गाथा हा सदाशिव शिवदे आणि शौर्याचे धारकरी प्रभाकर सिनारी यांच्यावर लिहिलेला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा लेख विशेष वाचनीय आहे.
जडण-घडण
संपादक : डॉ. सागर देशपांडे
प्रकाशक : सह्याद्री प्रकाशन
101, पहिला मजला,
रामकृष्ण परमहंस गृहरचना,
पर्वती पुलाजवळ, सिंहगड रोड,
पुणे-30.
पृष्ठे : 210, किंमत : 130 रु.
गुंफण
पुनर्जन्म किती वास्तव...किती थोतांड? या विषयावरील विशेष परिसंवादात डॉ. विश्वास मेहेंदळे, शिरीष कुलकर्णी, डॉ. कन्हैया कुंदप, मोरेश्वर जोशी, प्रताप गंगावणे आणि ऍड. मुक्ता दाभोलकर यांचे "गुंफण' दिवाळी अंकातील लेख वाचनीय आहेत. पहिल्या महायुद्धाची शताब्दी आणि दुसऱ्या महायुद्धाच्या 75 व्या वर्षानिमित्त डॉ. अशोक चौसाळकर, जयवंत गुजर आणि प्रताप गंगावणे यांचे लेख आहेत. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. ज्येष्ठराज जोशी यांच्या कार्याचा परिचय त्यांचे बंधू मोरेश्वर जोशी यांनी करून दिला आहे. याशिवाय कथा, पर्यटन विषयक लेख, कविता,प्राचार्य रमणलाल शहा यांचे वर्षभविष्य, असे वाचनीय साहित्य आहे. विनोदी कथा स्पर्धेतील पहिल्या तीन कथांचाही या अंकात समावेश आहे. गेली वीस वर्षे गुंफणने सुरू ठेवलेली दर्जेदार दिवाळी अंकांची परंपरा यावर्षीही कायम आहे.
गुंफण
संपादक : बसवेश्वर चेणगे
कार्यकारी संपादक : गजानन चेणगे
प्रकाशक : "गुंफण', किवळ रोड, नवे गावठाण, मसूर, ता. कराड, जि. सातारा.
पृष्ठे : 180, किंमत : 100 रुपये.
आक्रोश
 विनोदी आक्रोशच्या दिवाळी अंकात चंद्रकांत महामिने यांची विनोदी कादंबरी, द. मा. मिरासदार, नागेश शेवाळकर, बंडा यज्ञोपवित, प्रा. अजित पाटील, प्रा. व. बा. बोधे यांच्या कथा, खलिल खान, ज्ञानेश सोनार, प्रशांत आष्टीकर यांच्यासह व्यंगचित्रकारांची हास्यचित्रे, वात्रटीका आणि कविता यांचा समावेश आहे. विनोद या विषयांना वाहिलेला या दिवाळी अंकाची सजावटही उत्तम आहे.
आक्रोश
संपादक : ज्ञानेश वि. जराड
प्रकाशक : आक्रोश प्रकाशन,
फलटण, जि. सातारा.
पृष्ठे : 208, किंमत : 100 रुपये
जनमंगल
सुरेख मांडणी, आकर्षक सजावट आणि पानिपतकार विश्वास पाटील, द. मा. मिरासदार, शिरीष कुलकर्णी, डॉ. भारतकुमार राऊत, डॉ. भालचंद्र कानगो, भाई वैद्य, डॉ. प्रकाश पवार यांच्या कथा आणि लेखांनी जनमंगलचा हा दिवाळी अंक विशेष वाचनीय झाला आहे. प्रा. मंजिरी फडके यांचे विशेष राशी भविष्यही आहे."राजकारण काल आणि आज' या विषयावरच्या परिसंवादातील लेख सध्याच्या सत्ताकेंद्रे आणि घराणेशाहीच्या राजकारणावर प्रकाशझोत टाकणारे आहेत.
जनमंगल
संपादक : ऍड. वर्षा माडगुळकर
प्रकाशक : साप्ताहिक जनमंगल
राजधानी टॉवर्स, सातारा.
पृष्ठे : 100.
अनुभव
शोधाशोध या विशेष लेखमालेत जातींच्या जोखडात : दीप्ती राऊत, कॅन्सर समजून घेताना : अनिल अवचट, कॉंग्रेस : पिछेहाटी-नंतरचे पेच : सुहास पळशीकर यांचे लेख वाचनीय आहेत. भारताचे मंगळयान पहिल्याच प्रयत्नात थेट मंगळाच्या कक्षेत कसे पोहोचले आणि त्यासाठी भारतीय तंत्रज्ञांनी - शास्त्रज्ञांनी संपूर्ण भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान कसे निर्माण केले याचा वेध घेणारा "मंगल यश' हा मयूरेश प्रभुणे यांचा विशेष लेख, छायाचित्राद्वारे भग्न होत असलेल्या अजिंठ्याच्या प्राचीन चित्रांना नवे स्वरूप देणाऱ्या अवलिया छायाचित्रकाराचा मुक्ता चैतन्य यांनी करून दिलेला परिचय हे या अंकांचे वैशिष्ट्य ठरावे. मी शिष्य-मी गुरू: या लेखाद्वारे आरती अंकलीकर यांनी आपला गान आणि विद्यादानाचा प्रवास उलगडून दाखवला आहे तर भ्रष्टाचाराशी लढणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकारी सदानंद दाते यांनी मला उमगलेलं माझ्यापुरतं सत्य या लेखात आपल्या एकाकी वाटचालीचे कथन केले आहे. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी दुबई : आता कशाला उद्याची बात, या लेखाद्वारे दुबईचा भुलभुलैय्या वाचकांना समजावून दिला आहे. 1888 मध्ये चित्रकार व्हिन्सेंट व्हॅन गॉग याने काढलेले निसर्ग चित्र पहिल्या पानावर आहे तर या थोर चित्रकाराचा परिचय वसंत आबाजी डहाके यांनी करून दिला आहे.  अत्यंत सुरेख मांडणी आणि सजावटीने हा अंक वाचनीय झाला आहे.
अनुभव
प्रकाशक : युनिक फिचर्स,
8, अमित कॉम्प्लेक्स,
474, सदाशिव पेठ,
टिळक रोड, पुणे : 30
पृष्ठे : 186, किंमत : 120 रुपये.
साहित्य चपराक
 साप्ताहिक साहित्य चपराकचा या वर्षीचा दिवाळी अंक कथा, विशेष लेख, कविता आणि वैचारिक लेखांनी वाचनीय झाला आहे. बाबासाहेब पुरंदरे : कथा शिवचरित्र कथनाची, उमेश सणस : मराठी कादंबरीची कथा आणि व्यथा, रामनाथ चव्हाण : भटक्या विमुक्तांचे सामाजिक, शैक्षणिक जीवन व समस्या, प्रशांत चव्हाण : माळीणच्या वाटेवर हे लेख वाचनीय आहेत. इस्लामची मूलतत्त्वे या प्रदीर्घ लेखात मुस्लीम धर्म आणि साहित्याचे व्यासंगी अभ्यासक शेषराव मोरे यांनी मुस्लीम धर्म आणि साहित्यातल्या विविध परंपरांचा मागोवा घेत, मुस्लीम धर्माचे खरे स्वरूप वाचकासमोर निर्भीडपणे मांडले आहे.
शरद पवार : प्रदीर्घ काळातील काही निरीक्षणे हा अरुण खोरे यांचा लेख पवारांच्या राजकीय प्रवासावर प्रकाशझोत टाकणारा आहे.
साहित्य चपराक
संपादक : घनश्याम पाटील.
प्रकाशक : चपराक प्रकाशन
617, साईकृपा, पहिला मजला,
शिवाजी रस्ता, शुक्रवार पेठ, पुणे.
पृष्ठे : 200, किंमत : 130 रुपये.
साधना : बालकुमार
साधनाच्या बालकुमार दिवाळी अंकात कोसळलेल्या बसमधला माणूस : अनिल अवचट, तीन मुली आणि एक कुत्रा : दमन सिंग, शाळेतले दिवस : अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, एक संस्मरणिय मोहीम : जयंत नारळीकर यांचे बालकुमारांसाठी वाचनीय लेख आहेत. बालकुमार अंक हे साधनाचे वैशिष्ट्य. सुरेख रेखाटनांनी हा अंक अधिकच सुरेख झाला आहे.
साधना युवा दिवाळी अंक
मनमोहन सिंग यांच्या तीन मुली : दमन सिंग, अल्ला-उद्दीनचा दिवा : कुमार केतकर, माझ्या आठवणीतले न्यूयॉर्क : अच्युत गोडबोले, एका सेक्युलर कॉलेजची गोष्ट : चिन्मय दामले, "फ्रॅंड्री' आधीचा मी : नागराज मंजुळे यांचे लेख या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य आहे. या जीवनाचं काय करू? या लेखात अभय बंग यांनी दिशाहीन असलेल्या युवकांना प्रकाशाच्या दिशेने जाणारे मार्ग आहेत आणि परिवर्तन युवकांनीच घडवायला हवं, असा सुसंवाद युवकांशी साधला आहे. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी डॉ. शैला दाभोलकर यांनी आपल्या संसारिक जीवनाचा पट आणि वाट सापडली या लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे.
संपादक : विनोद शिरसाठ
प्रकाशक : साधना साप्ताहिक,
926, सदाशिव पेठ,
पुणे 411 030
युवा साधना दिवाळी अंक
पृष्ठे : 58, किंमत 40 रुपये.
साधना बालकुमार दिवाळी अंक
पृष्ठे 34, किंमत 25 रुपये.

स्वागत दिवाळी अंकाचे 2

लोकप्रभा
लोकांच्या नजरेत सुंदर आणि तरुण दिसणे ही चित्रपटतारकांची गरज असते. तेच त्यांचे खरे भांडवल असते. त्यामुळे प्लॅस्टिक सर्जरी करून लोकांच्या नजरेत स्थिरावणा-या चित्रपट कलाकार आणि त्यांचे अनुकरण करणा-या त्यांच्या चाहत्यांबाबतची माहिती प्लॅस्टिक सर्जरीसाठी असलेल्या ‘मेक टू ऑर्डर’मधील तज्ज्ञांच्या सहा लेखांतून मिळते. ‘एफएफ’ वाहिन्यांमधून लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या सात ‘आरजे’च्या आत्म संवादातून त्यांचा लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समजतो. सगळयांनाच आवडेल, असा हा विषय आहे. त्याचबरोबर कोल्हापूरमधील चांदीनगरी हुपरी, मातृदेवता लक्ष्मी आणि कोयना विद्युत प्रकल्पाच्या हीरक महोत्सवानिमित्ताने हे विशेष लेख यात आहेत.
कार्यकारी संपादक : विनायक परब
पाने : १२४
किंमत : ४०

चारचौघी
बाजाराचा, चालू परिस्थितीचा, वाचकांच्या बदलत्या आवडी-निवडीचा आढावा घ्यायचा आणि मासिकाच्या मजकुरात बदल करायचा, जेणेकरून मासिक सदैव वाचनीय होईल, हा फंडा ‘चारचौघी’ने आपल्या दिवाळी अंकातही वापरला आहे. मात्र अंकाची सुरुवात होते ती कथांपासून. अंकाच्या सुरुवातीलाच असलेल्या शुभा नाईक यांच्या ‘निरभ्र’ या कथेतून दोन महिलांच्या नात्यांतील धागा उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुढच्याच गुरुनाथ तेंडुलकर यांच्या ‘बाईच्या जातीला’ या कथेतून चूल आणि मूल या भवताली फिरणारी महिलांचीच कलुषित वैचारिक परंपरा समोर येते. मात्र खिळवून ठेवतो, तो या अंकातील ‘स्वभावाला औषध आहे’ हा परिसंवाद! या परिसंवादाच्या माध्यमातून मानवी स्वभावाचे अनेकविध कंगोरे उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यातील काही कंगोरे हे आपल्यालाच आपल्या स्वभावाची ओळख करून देणारे असल्याने आपल्यालाही आपली नव्याने ओळख होते. ‘उद्याचं टेक्नोवर्ल्ड’मधून जगभरातील ‘जगातील पहिले कचरा व कार्बनविरहित शहर’, स्वयंचलित कृत्रिम हृदय’, ‘ओएलईडीचा वाढता वापर’, अंतराळातील पहिले हॉटेल’ आणि ‘ई-कागद’, ‘जगातील पहिले एचआयव्ही व्हॅक्सिन’ इत्यादी नवनव्या माहितीचा आढावा घेण्यात आला आहे. सोबतच ‘व्लादिवस्तोक रशिया-काही गमतीशीय आठवणी’ हा अनुप्रिता परांजपे यांचा दीर्घ लेख थेट आपल्याला रशियात नेतो. तर ‘कर्तृत्वाच्या वाटेवरील प्रतिमा’मधून आपल्याला जागतिक चित्रपटांतीची सैर घडवून आणण्यात आली आहे. ‘दिवाळी डेकोरेशन टिप्स’ आणि वार्षिक राशी भविष्यही अंकात देण्यात आले आहे.
चारचौघी
संपादक : रोहिणी हट्टंगडी
पृष्ठे : २५७
मूल्य : १०० रुपये

दक्षता
‘सद्रक्षणाय खल् निग्रहणाय्’ असं म्हणत नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणा-या महाराष्ट्र पोलिसांचे ‘दक्षता’ हे मासिक. या अंकात अपर पोलिस महासंचालक मीरा बोरवणकर (पुणे कारागृह) यांची विशेष मुलाखत आहे. बोरवणकर यांच्या बालपणापासून पोलिस सेवेतील त्यांचे आयुष्य उलगडणारी ही मुलाखत आजच्या तरुणींना निश्चितच ‘दक्षता’च्या माध्यमातून मार्गदर्शक ठरेल. यंदाच्या दक्षता दिवाळी अंकाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे दक्ष नागरिक आणि सुरक्षिततेची गुरुकिल्ली! सध्याच्या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत गुरुमंत्र देण्याचा प्रयत्न ‘सामान्य माणूस व सर्वागीण सुरक्षा’ या विषयांतर्गत करण्यात आला आहे. माजी पोलिस महासंचालक व्ही. के. सराफ यांच्या ‘सेफ लिव्हिंग : प्रोटेक्शन विदाउट पोलिस’ या इंग्रजी पुस्तकातील निवडक लेखांच्या अनुवादातून ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा, लहान मुलांची सुरक्षा, वाहनचोरी, चोरी व दरोडय़ांबाबत नागरिकांनी कशा पद्धतीने जागरूक राहावे, याबाबत निश्चितच मार्गदर्शन मिळेल. ‘सायबर सुरक्षा’ विभागांतर्गत ‘दक्षता’ने नागरिकांना दक्ष करण्याचा प्रयत्न केला आहे. एटीएम पीन व मेसेज, ई-मेल स्पुफिंग, बनावट एटीएम सेंटर, सोशल नेटवर्किंगवर येणा-या अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट्स, फेसबुकवरून होणारी बदनामी, मोबाइल हॅकिंग, क्रेडिट कार्डमधील फ्रॉड, ई-मेलद्वारे ऑनलाइन लॉटरीचे आमिष दाखवून होणारी फसवणूक, अश्लील व्हीडिओ आणि छायाचित्रांच्या साह्याने संकेतस्थळावर होणारे गैरप्रकार, मोबाइलची सुरक्षा आदींबाबत ‘सायबर सुरक्षा’ अंतर्गत छापलेले लेख तरुणाईला सायबर क्राइमपासून दक्ष राहण्याकरता मार्गदर्शक ठरू शकतील, असे आहेत. याचबरोबर कथा, कवितांचीही मेजवानी, खाऊगल्लीच्या सफरीसह दिवाळीसाठीच्या रेसिपीज् आणि करिअर मंत्रही मार्गदर्शक आहेत.
सरसंपादक : डॉ. रश्मी करंदीकर (पोलिस उपायुक्त, ठाणे)
पाने : २१०
किंमत : ७० रु.

मुक्त शब्द
सातत्याने दर्जेदार साहित्य देणा-या दिवाळी अंकांमध्ये ‘शब्द’ने गेली काही वर्षे आपले स्थान कायम राखले आहे. यंदाही वाचकांची निराशा होणार नाही याची दक्षता संपादक मंडळाने घेतली आहे. शांताल अ‍ॅकरमन या बेल्जियन ज्युईश दिग्दर्शिकेचा, तिच्या वेगळ्या चित्रपटांचा संध्या गोखले यांनी करून दिलेला परिचय हा पहिलाच लेख त्याची खूण पटवतो. पॅलेस्टिनी कवींच्या कविता, अनिल अवचटांच्या गावांविषयीच्या आठवणी, कपिल पाटील यांचा मोदींविषयीचा लेख, सानिया, वंदना भागवत, प्रतिमा जोशी, कृष्णात खोत, मनस्विनी लता रवींद्र, आसाराम लोमटे, मिलिंद बोकील, जयंत पवार यांच्या कथा या सा-यांनीच अंकाचं पानंपान वाचनीय या विभागात नेऊन ठेवलंय. माझ्या आयुष्यातील घोडचूक हा अत्यंत अल्प प्रतिसाद मिळालेला आणि सर्वात वाचनीय असा दोन लेखांचा विभाग, ‘ती’च्या कविता, मी आणि माझा काळमध्ये लिहिते झालेले नामवंत आणि ख्यातनाम साहित्यिकांच्या अनुवादित कथा, मिलिंद बोकील यांना बोलते करणारी अंजली जोशी यांनी घेतलेली मुलाखत या सगळ्याचा शब्द न् शब्द वाचनीय आहे.
मुखपृष्ठाचे ख्यातनाम चित्रकार प्रभाकर कोलते यांनी केलेले रसग्रहण आणि उत्कृष्ट छपाई यांचाही उल्लेख टाळता येणार नाही.
संपादक : यशोधन (येशू) पाटील
पृष्ठे : २४८
मूल्य : १८० रुपये

स्वागत दिवाळी अंकाचे 1

अनुभव

युनिक फिचर्सचा हा दिवाळी अंक ललित, कथा आणि लेखांसह अनुभव कथनाचा अफलातून संग्रह आहे. विविध वाचकांची आवड-निवड जपणार्‍या या अंकात अनेक मान्यवरांच्या साहित्याचा समावेश आहे. त्यात आरती अंकलीकर यांच्या ‘मी शिष्य, मी गुरू’, वसंत डहाके यांच्या ‘व्हॅन गॉग: सव्वाशे वर्षांनंतर’, मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘सहा मैलांचा रस्ता’ या लेखांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. अंकाच्या मुखपृष्ठासाठी १८८८ मध्ये व्हॅन गॉग यांनी रेखाटलेल्या चित्राचा वापर ही संकल्पना सुखद आहे.
कथाविभागात मंजू एहतेशाम यांची ‘छत्री’, आणि स्वयंप्रकाश यांची ‘रशीदचा पायजमा’ या कथांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. याशिवाय, अनिल अवचट यांचा ‘कॅन्सर समजून घेताना’ आणि डॉ. भरत केळकर यांचा ‘मी डॉक्टर, युद्धभूमीवरचा’ हे लेख विशेष वाचनीय झाले आहेत. विविध विषयांना स्पर्श करणार्‍या लेखांमुळे वाचकांचे अनुभवविश्‍व समृद्ध होणार आहे. ‘अनुभव’च्या या संग्राह्य दिवाळी अंकाची किंमत १२० रुपये आहे.

दीपोत्सव

 दैनिक लोकमतचा ‘दीपोत्सव’ हा बहारदार अंक नावाप्रमाणेच अंक नव्हे उत्सव आहे, असेच म्हणावे लागेल. या अंकाची सुरुवातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा अनुवाद असलेल्या ‘डिजिटल इंडिया’ या लेखाने झाली आहे. याशिवाय, मेलिण्डा गेट्‌स, शाहरूख खान, अरुंधती भट्टाचार्य, मार्क टुली, सचिन तेंडुलकर, आलिया भट, पं.शिवकुमार शर्मा आणि कपिल शर्मा यांच्यासारख्या पूर्णत: भिन्न क्षेत्रातील दिग्गजांच्या लेखांचा समावेश आहे. याशिवाय, ‘मेरी कोम आणि घराबाहेर उडालेली माणसं’ हा चित्रा अहेंथेम यांचा लेख विशेष जमून आला आहे. ‘ट्रक नहीं ये तो दुल्हन है हमारी’ हा शर्मिला फडके यांचा लेखही उत्तम. एकूण विविध विषयांना स्पर्श करणार्‍या पण माहितीपूर्ण अशा या संग्राह्य अंकाची किंमत २०० रुपये आहे.

हिंदुस्तान

या दिवाळी अंकाची सुरुवात ख्यातनाम अभिनेत्री आणि विचारवंत डॉ. निशिगंधा वाड यांच्या विशेष संपादकीय लेखाने झाली आहे. लेख आणि कथा-कवितांचा भरगच्च नजराणा देणार्‍या या अंकात बालवाचकांसाठी खास विभागही देण्यात आला आहे. डॉ. विजया वाड यांची ‘हरवले ते गवसले का?’ आणि निळू तायडे यांची ‘शेंदर्‍या’ या कथांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. लेखमालिकेत सुधाकर तट्टे यांचा ‘स्त्री म्हणजे झोपेची गोळी नव्हे’, डॉ. सुभाष गवई यांचा ‘न्यायालयाच्या निर्णयातील मतदारांच्या नकाराधिकाराची अपरिहार्यता किती’ आणि मृणालिनी खेर यांच्या ‘युवाशक्तीला जगण्याचे बळ’ हे लेख माहितीपूर्ण आहेत. यासोबतच, परिसंवाद, कविता, एकांकिका, व्यंग्यचित्रे, राशीभविष्य असा भरगच्च खाऊ वाचकांसाठी असलेल्या अंकाची किंमत ७० रुपये आहे.

स्वप्ना

या दिवाळी अंकाची विशेषता म्हणजे हा अंक ‘शून्यातून विश्‍वाकडे’ या संकल्पनेवर आधारित आहे. लेख आणि कवितांचा भरपूर वाचनमेवा या अंकात आहे. डॉ. यु.म.पठाण, गोविंद केळकर, सुमित गाडेकर, देवानंद लोंढे, हरिभाऊ कुलकर्णी आणि नसीमा महात यांचे विविध विषयांवरील लेख छान झाले आहेत. लेखमालिकेची सुरुवात करणार्‍या विनीत कुबेर यांच्या ‘नरेंद्र मोदी - भास्कर जो तापहीन’ या लेखाचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. गेल्या वर्षभरात भारतीयांसह जगातील नागरिकांच्या मनात स्थान मिळविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैचारिक प्रेरणेची दखल यंदाच्या दिवाळी अंकांनीही घेतल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे हे सर्व लेख ‘शून्यातून विश्‍वाकडे’ याच संकल्पनेवर आधारित आहेत. याशिवाय, खलिल खान यांच्यासह अन्य मान्यवरांची व्यंग्यचित्रे विषयाला पूरक आहेत. या संग्राह्य अंकाची किंमत १०० रुपये आहे. प
रेवती जोशी-अंधारे
नागपूर

जागतिकीकरणाचे `रणांगण’
सध्याचे युग जागतिकीकरणाचे आहे, हे डोळ्या समोर ठेवत डॉ. अविनाश गारगोटे संपादीत रणांगण या दिवाळी अंकात जागतिकीकरणाच्या विविध पैलूंचा परामर्ष घेणारे अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने आदिनाथ हरवंदे यांचा `विश्वाचे आर्त त्यांच्या मनी प्रकटले’, `उपचार आणि शुश्रुषा’, संतोष पाठारे यांचा `मराठी सिनेमा जागतिक पटलावर’, मृदुला दाढे जोशी यांचा `आणि संगीताचा बदलता चेहरा’, या लेखांचा प्रामुख्याने समावेश आहे. जातिकीकरण आणि त्याचे विविध विषयांवरील परिणाम रणांगणातून मांडण्यात आले आहेत. या सोबतच चांगदेव काळे, डॉ. सविता भावे, सदाशिव टेटविलकर, अरविंद भालेराव, गजानन म्हात्रे, अरविंद बुधकर, संपदा वागळे, मिलिंद कल्याणकर, डॉ. अविनाश गारगोटे यांचे लेख, कथा वाचनीय आहेत. या अंकातील `कविता-कविता’ आणि `गझल कट्टा’ यातील काव्यही रणांगणाचे वैशिष्ट्य म्हणता येईल.
संपादक – डॉ. अरविंद गारगोटे,  पाने – 192,   किंमत – 151 रूपये
महानगरी वार्ताहर
`महानगरी वार्ताहर’च्या दिवाळी अंकात साहित्याचा आगळा फराळ देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  कथा, मुलाखत, लेख, सिनेजगताची सफर, परिसंवाद, व्यंगचित्र, बालजगत, काव्यसुमने यांचा या अंकात समावेश करण्यात आला आहे. विजया दीक्षित यांची युगांतर, सुप्रिया अय्यर यांची प्रभावळ, बाळ राणे यांची अंधाराच्या दिशा या कथा या अंकात आहेत. `कंटाळ्यावर उतारा’ ही अनुवादित कथा, कॅप्टन आनंद बोडस, ले.जनरल दत्तात्रय शेकटकर, डॉ. प्रमोद पाठक, श्री. वा. नेर्लेकर यांचे लेख; मधु पोतदार यांचा `लघुकथेवरील मराठी चित्रपट’ हा लेख वाचनीय आहे. परिसंवाद या दालनात रमेश पतंगे, राधाकृष्ण नार्वेकर, अनिल डोंगरे, डॉ. संजय रत्नपारखी, प्रा. डॉ. औचरमल एल. वाय., प्रा. किशोर काजळे आदी मान्यवरांचा समावेश आहे. बाबू गंजेवार यांची व्यंगचित्रे मार्मिक झाली आहेत. बालजगतमध्ये लहान मुलांसाठी वाचनीय साहित्य आहे. तसेच प्रा. पंढरीनाथ रेडकर, माधव गवाणकर, अशोक भालेराव, डॉ. श्रीकांत नरुले, हेमंत डांगे, इंद्रनील तावडे यांच्या कविता वाचकांना वेगळा अनुभव देतात.
संपादक – सतीश सिन्नरकर  पाने – 210  किंमत – 150 रुपये
स्वप्ना
विविध क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांची सध्या जोरात चर्चा सुरू असताना `स्वप्ना’चा दिवाळी अंक हा भ्रष्टाचार विशेषांक म्हणून काढण्यात आला आहे. हलकेफुलके साहित्य व व्यंगचित्रांचा शिडकावा या अंकात करण्यात आला आहे. मेघा पाटकर, ऍड. उदय वारुंजीकर, विवेक वेलणकर, प्रा. वैजनाथ महाजन, उत्तम कांबळे यांचे भ्रष्टाचारावर विवेचन करणारे लेख; पंडीत हिंगे व खलील खान यांच्या कथा तसेच डॉ. श्रीकांत नरुले, प्रा. नंदकुमार सुर्वे, गोविंद मोतलग, सु.रा. देशपांडे यांच्या कवितांचा अंकात समावेश आहे. खलिल खान, प्रशांत आष्टीकर, महादेव साने यांची व्यंगचित्रे खुसखुशीत झाली आहेत. अंकात `पानपुरके’मध्ये वात्रटिका व विनोदांचा अंतर्भाव मनोरंजक ठरला आहे. अंकाचे मुखपृष्ठ भ्रष्टाचार विशेषांकाला साजेसे झाले आहे.
संपादक – वि.द. बर्वे  पाने – 306  किंमत – 100 रुपये
साहित्य मैफल
`साहित्य मैफल’च्या दिवाळी अंकात विशेष लेख, ललित व आध्यात्मिक कथा, संस्था परिचय, यशोगाथा, कवितांचा समावेश आहे. विष्णू परब यांचा विशेष लेख वाचनीय झाला आहे. बाळ राणे, अरुण डावखरे, सुधीर सुखठणकर, डॉ. शुभांगी पारकर, अरुणकुमार यादव, गणेश पाटील, जयंत कोरगावकर, देवीदास पोटे यांच्या कथाही मनाला भावणार्या झाल्या आहेत. संविता आश्रम व अभिनव फाऊंडेशन या संस्थांचा विस्तृत परिचय या अंकात आपल्याला होतो. प्रशांत असलेकर यांचा `उद्योजकांची यशोगाथा’ हा लेख आपल्याला उद्योगजगताची माहिती देणारा आहे. कवितेचे दालन ह.शि. खरात, विद्या साठे, पुष्पा पोरे, विजय शिंदे, वर्षा देसाई, भगवान निळे, प्रा. प्रतिभा सराफ यांच्या कवितांनी सजले आहे.
संपादक – कुमार कदम     पाने – 170    किंमत – 90 रुपये

चित्रलेखा
मराठीतील ‘चित्रलेखा’ या बहारदार मासिकाचा दिवाळी अंक हा खासमखास आहे. ‘चित्रलेखा लक्षवेधी’ या विशेष लेखांच्या मालिकेत ‘शंकराचार्याचे दिव्यदर्शन’ हा खास लेख आहे. हिंदू धर्मात शंकराचार्याचे स्थान मोठे आहे. त्यांचं धर्मातील स्थान कोणते? शंकराचार्य म्हणजे काय? त्यांची परंपरा कोणती आदींची माहिती या लेखात दिली आहे. शंकराचार्य पीठाची स्थापना करणारे आद्य शंकराचार्य इसवी सनाच्या ७८८ ते ८२० च्या दरम्यान होऊन गेले. त्यानंतर भारतात शंकराचार्याची परंपरा कायम आहे. भारताच्या सांस्कृतिक पर्यावरणात शंकराचार्यानी आपल्या नवविचारांनी चैतन्याची शिंपडण केली. सध्या अस्तित्वात असलेल्या शंकराचार्य पीठांमध्ये प्रमुख चारपीठं असली तरी स्वत:ला शंकराचार्य म्हणवणारे २० ते २२ शंकराचार्य आहेत. या पीठावर फक्त ब्राह्मण जातीतील पुरुषांची नियुक्ती केली जाते. सध्या शंकराचार्य ही राजकीय पक्षांची तळी उचलणारी सत्ता केंद्रे बनली आहेत. गुन्हेगारी, राजकारण, अनैतिकता इत्यादी बाबी उफाळून आल्याने ही सारी शंकराचार्य पीठं बदनाम झाली आहेत.
‘शहेनशहा अकबर’ या विशेष लेखात सम्राट अकबराविषयी अभ्यासपूर्ण लेख आहे. आपल्या आयुष्यात ‘गाझी’ ते ‘धर्मनिरपेक्ष सम्राट’ असा प्रवास त्याने साध्य केला. अकबर हा सर्व समाज हा ‘जगत्गुरू’ असे संबोधत असे. एवढे त्याचे राज्य न्यायी होते. अकबराच्या काळात युरोपातून प्रवासी, धर्मगुरू, राजदूत आले. त्यांनीही अकबराच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्याने धर्मनिरपेक्ष, संघटित शिक्षण व्यवस्था उभारली, असे अभ्यासकांचे मत आहे.
‘रंग-अभंग’ या पाच लेखांच्या मालिकेत ‘रेशीमगाठीत खूप काही जमलंय!’ ललित प्रभाकर, ‘अप्सराने माझ्यात निर्मिली बदलांची प्रयोगशाळा’-डॉ. माधुरी सावंत, उद्योगपती सतीश चव्हाण यांच्यावरील ‘१२ वर्षात माझी वार्षिक उलाढाल ० ते ३०० कोटी’, ‘लावणी कला संघर्ष बावनकशी’ वर्षा संगमनेकर, ‘माझा प्रवास सत्यशोधकी’ डॉ. श्रीराम गुंदेकर, ‘कलाकारीनं घुमवलं नाव बनवलं’ ख्वाजा सय्यद आदींची माहिती आहे.
‘डाएट आणि फिटनेस’, ‘जय जाधव यांची ऑनलाइन हास्यचित्रे, तंत्रज्ञानाची दिवाळी, दिव्यांचा रेकॉर्ड आदी सदरेही आहेत.
संपादक : ज्ञानेश महाराव
पाने : ११४
किंमत : ५० रुपये

Kalnirnayकालनिर्णय
कालनिर्णयचा दिवाळी अंक हा भरगच्च विविधांगी मजकुराने रंगलेला आहे. ‘ओम नमो शिवाय काही नाही’ या रघुवीर कुल यांच्या लेखात देशातील जाहिरात विश्वाची मानसिकता रेखाटली आहे. भारतात काहीही विकायचं असलं तरी धर्माचा आधार घ्यावा लागतो. देशात आधुनिक  शिक्षण सुरू झाल्यानंतरही धार्मिकता वाढतच आहे. कुंभमेळयात आंघोळ करणा-या आठ कोटी माणसांसाठी लाइफबॉय आणि टाटा स्वच्छ साबणाची जाहिरात करण्याची संधी १२ वर्षात येणार नव्हती. अनेक मोबाइल कंपन्यांनी हनुमान चालिसाच्या पोथ्याही वाटल्या. मॅकडोनाल्ड या जगविख्यात बर्गर चेनला भारतात येण्यापूर्वी बीफ पूर्णपणे काढून टाकावे लागले. शाकाहारीसाठी हिरवा तर मांसाहारीसाठी ब्राऊन ठिपका छापावा लागतो. ‘देवो के देव महादेव’ ही मालिका आबालवृद्धांना वेड लावणारी ठरली. हॅँडसम ‘शिव’ घराघरांत पोहोचला. ‘परिवर्तनाची पंचसूत्री’ या संदीप वासलेकर यांच्या लेखात देशातील परिस्थिती न बदलण्यावर भाष्य केले आहे. अनेक योजना, धोरणे राबवूनही भारतात फरक पडलेला नाही. आपण सर्वागीण विकासाबाबत विचारच करत नाही. देशात बदल घडवायचा असल्यास परिवर्तन घडवणे आवश्यक आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानसिक स्तरावर बदल घडला पाहिजे. आतापर्यंत आर्थिक उन्नती झाली तरीही ‘काही तुपाशी बाकी उपाशी’ अशी परिस्थिती आहे. हा बदल सर्वसमावेशक नसल्याने समाजात तुपाशिवाल्यांची संख्या वाढली आहे. पण उपाशींचीही संख्या वाढली आहे. राज्यात ४४ हजार खेडी असून ३३ हजार खेड्यांमध्ये शाळा नाही. आइसलॅँडसारख्या छोटय़ा देशात २०० लोकसंख्या असलेल्या गावांत सर्वसोयी असलेल्या शाळा आहेत. त्यासाठी भारताने सैद्धांतिक चौकट, नेते-नागरिक संबंध सहकाराचे, घटनात्मक किंवा राष्ट्रीय संस्था, राष्ट्राची ओळख आणि सुरक्षा, धोरणं आदींकडे लक्ष द्यायला हवे. ‘भ्रष्टाचाराची मूलतत्त्वे’ हा निळू दामले यांचा लेख, ‘वैचारिक संघटना आणि आपल्याकडील विचार ‘खंत’ हा डॉ. चंद्रहास देशपांडे यांचा लेख विचार करणारा आहे. ‘प्लेबॉय’ या लैंगिकतेविषयी मासिकाची माहिती देणारा विशेष लेख या दिवाळी अंकात आहे. मानवी संवेदनांची भूक भागवणारी इतर माध्यमे नव्हती त्या काळात मासिकाने एक व्यासपीठ तयार केले होते. या मासिकामुळे समाजात अनेक बदल झाले. लैंगिकतेबाबत मोकळेपणा आला, हे विसरता येणार नाही. ‘नवी गाणी नवा साज’ या लेखात सध्याच्या काळात धुमाकूळ घालणा-या गाण्यांचा काळ आला आहे. मुकुंद कुळे यांनी नवीन गाण्यांची माहिती त्यात रेखाटली आहे. ‘उदयाचा मराठी सिनेमा’, ‘बदलता रशिया’, ‘अन्यायाचे परिमार्जन’ आदी लेख विशेष आहेत. तसेच दाजीपूरची अरण्ययात्रा, धक्कथा, कविता, व्यंगचित्रे आदींनी हा अंक भरगच्च झाला आहे.
संपादक : जयराज साळगांवकर
पाने : २३२
किंमत : १०० रुपये

Vayamवयम्
भारताने मंगळावर यशस्वी स्वारी केल्यापासून सर्व भारतीयांची छाती अभिमानाने फुलून आली आहे. अंतराळ संशोधन हे क्षेत्रही करिअरसाठी किशोर-युवावयीने पिढीला खुणावू लागले आहे. किशोरवयीन मुलांमध्ये तर एकूणच या क्षेत्राविषयी अपार कुतूहल आहे. हे कुतूहल, जिज्ञासूंचे शंकासमाधान करील असे डॉ. बाळ फोंडके आणि मोहन आपटे यांचे विशेष लेख हे ‘वयम’च्या यंदाच्या दिवाळी अंकाचे खास वैशिष्टय़ म्हणावे लागेल. अत्यंत देखणी सजावट, टाइप, कागद ही देखील वयमची खासियत म्हणावी लागेल. ‘यल्लो’ चित्रपटातील गौरी गाडगीळ, अभिनेत्री केतकी माटेगावकर आणि हत्तींशी संवाद साधणारे आनंद शिंदे यांच्या मुलाखतींमधून मुलांना प्रेरक असे खचितच गवसू शकते. अभिनेत्री स्पृहा जोशी, मृणाल कुलकर्णी, मुकुंद टाकसाळे, सुबोध जावडेकर, राजीव तांबे, डॉ. आनंद जोशी, मंजुश्री गोखले यांचे कथा-लेख याचबरोबर एक वर्षभर सुट्टी अनुभवणा-या आणि त्यातून बरेच काही गवसलेल्या हर्षवर्धन गोखले या मुलाचे वेगळेच अनुभवकथन यांचा विशेष उल्लेख करावा लागेल. सतत मुलांमध्ये वावरणा-या मोठय़ांना मुलांकडून काय मिळते याविषयीचा देणे मुलांचा हा विभागही वेगळा आणि वाचनीय आहे. ‘देशोदेशींच्या शाळा’ या विभागात परदेशांतील शाळांचे गुणविशेष वाचायला मिळतील. मुलांसह मोठय़ांनीही वाचावा असा हा अंक आहे.
मुख्य संपादक : शुभदा चौकर
पृष्ठे : १६४
मूल्य : ९० रुपये

Shabd Ruchiरुची
गेली अनेक वर्षे वाचक आणि पुस्तके यांच्यातील स्नेहदुवा बनून गेलेल्या ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ दिवाळी अंकाबद्दल असलेली उत्सुकता यंदाच्या अंकातील विविधांगी विषयांमुळे पूर्ण होते. इंटरनेट, सोशल नेटवर्किंग, आपलं ‘सर्च’ लाइफ,  आकाशवाणी याबद्दलचे विशेष लेख विभाग अंकाचे वैशिष्टय़ म्हणता येईल. याशिवाय, िलगबदल, विदूषक, लावणीसम्राट ज्ञानोबा उत्पात, चाचा चौधरीवाले व्यंगचित्रकार प्राण, वंशाचा दिवा हवा या सामाजिक मानसिकतेचे संभाव्य गंभीर परिणाम याविषयीचा लेख असे साहित्य उल्लेखनीय आहे. डॉ. दाऊद दळवी, प्रवीण बर्दापूरकर, नीला अशोक कोर्डे, रविप्रकाश कुलकर्णी, डॉ. अनंत लाभसेटवार, प्रभाकर भिडे यांचे लेख आणि कथाविभाग यामुळे अंकाच्या वाचनियतेत भर पडली आहे. कवितेची पानेही लक्षवेधक आहेत.
संपादक : अरुण जोशी
पृष्ठे : २३०
मूल्य : १०० रुपये

Mazhi Saheliमाझी सहेली
आधुनिक महिलांना डोळय़ासमोर ठेवून ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी सुरू केलेल्या या मासिकाचा हा पाचवा दिवाळी अंक आहे. महिलांना करिअर आणि घरसंसाराबाबत मार्गदर्शन तर आहेच पण आरोग्य, नातेसंबंध या सामाजिक तसेच अर्थकारणाविषयी, लोकसंस्कृती असे विविधांगी लेख आहेत. मात्र, विषयांमधील तोचतोचपणा आणि टिपिकल महिलांचे विषय या पलीकडे जाऊन नवीन प्रयोग यात केले गेलेले नाहीत. नियमित अंक आणि दिवाळी अंकात काही फरक जाणवत नाही.
संपादक : हेमा मालिनी
पाने : २१०
किंमत : ५० रुपये